जिल्हाधिकाऱयांना निवेदन : लवकरच भव्य मोर्चाचे आयोजन करणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेची निवडणूक पारदर्शक झाली नाही. ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडले गेले नाही. त्यामुळे मतदारांना मतदान कोणाला केले? हे समजलेच नाही. लोकशाहीमध्ये सुरू असलेला हा प्रकार लोकस्वातंत्र्यावरच घाला घालणारा आहे. तेव्हा ही निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी नुकतीच निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मतदारयाद्यांमध्ये अनेकांची नावे गहाळ झाली होती. त्यामुळे अनेकजण मतदानापासून वंचित राहिले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच मुळात चुकीची झाली आहे. त्यामुळे हा निकाल धक्कादायक लागला असून केवळ जिल्हय़ालाच नाहीतर साऱयांनाच आश्चर्य वाटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हीव्हीपॅट यंत्र जोडणे बंधनकारक आहे. असे असताना सर्व नियम डावलत मनमानीपणे ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
काही उमेदवारांच्या समोरील बटण दाबल्यानंतर आवाज येत नव्हता. मत कोणाला पडले आहे? हे देखील समजत नव्हते. आम्हा बऱयाच जणांना विजयाची खात्री असताना निकाल वेगळाच लागला आहे. तेव्हा ही निवडणूकच रद्द करून फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. काही उमेदवारांच्या कुटुंबांची व नातेवाईकांची मतेदेखील त्यांना पडली नाहीत, यावरून या निवडणुकीत घोटाळा झाला आहे, हे निश्चित आहे.
प्रत्येक निवडणुकीवेळी उमेदवारांना बोलावून मतदानाबाबतची माहिती दिली जाते. प्रात्यक्षिकही घेतले जाते. असे असताना यावेळी मात्र ते का करण्यात आले नाही? निवडणूक घाईगडबडीत जाहीर करून अशाप्रकारे गैरप्रकार करायचा होता, हे निश्चितच झाले आहे. तेव्हा या सर्व प्रकाराची चौकशी करून फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंढरी परब, मोहन बेळगुंदकर, संजय शिंदे, मनोहर हलगेकर, अंकुश केसरकर, नेताजी मनगुतकर, राजश्री हावळ, आप्पासाहेब पुजारी, संध्या पवार, ऍड. रतन मासेकर, विनायक गुंजटकर, संयोगीता हलगेकर, दिगंबर कातकर, सुधा भातकांडे, सीमा इनामदार, अखिला पठाण, गीता हलगेकर, मोतेश बारदेशकर, फहिमखान नाईकवाडी यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.