निवडणूक तारीखही उद्याच जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ पणजी
लवकरच होणाऱया पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपले पॅनल जवळजवळ निश्चित केले आहे. उद्या सोमवारी त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवडणुकीची तारीखही सोमवारीच जाहीर होण्याची शक्यता मोन्सेरात यांनी व्यक्त केली आहे.
पालिका निवडणूक पक्षीय चिन्हावर होणार नाही हे भाजपने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तसेच पणजी मनपा निवडणुकीसाठी आमदार श्री. मोन्सेरात हेच उमेदवारांची निवड करतील, असे भाजपनेच म्हटले होते. त्यासंबंधी मोन्सेरात यांना विचारले असता, भाजपने आपणास तसे स्वातंत्र्य देऊन विश्वास दाखवला याबद्दल आपण पक्षाला धन्यवाद देतो, तरीही पक्ष पदाधिकाऱयांच्या सल्ल्यानेच उमेदवार निवडीस अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे ते म्हणाले.
त्यानुसार बाबूश यांनी निम्यापेक्षा जास्त उमेदवारांची निवड निश्चित केली असून सर्व नावांची यादी पक्ष कार्यकारिणीकडे पाठवून अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पणजी मनपाचे एकूण 30 प्रभाग असून सर्व प्रभागात बाबूश पॅनलचे उमेदवार असणार आहेत. त्यात विद्यमान नगरसेवकांमधील 13 जणांचा समावेश असेल. उर्वरित 17 उमेदवार हे काही माजी नगरसेवकांसह नवीन चेहरे असतील, असे ते म्हणाले.
याच निवडणुकीच्या माध्यमातून मोन्सेरात यांचा सुपूत्र रोहित आणि माजी नगराध्यक्ष यतीन पारेख यांचा सुपुत्र करण यांचा राजकीय प्रवेश होणार आहे. अन्य संभाव्य उमेदवारांमध्ये विद्यमान नगराध्यक्ष उदय मडकईकर, माजी महापौर कारोलिना पो, संजीव नाईक, बॅन्तो लॉरेनो, एडी जॉर्ज, प्रसाद आमोणकर, शुभम चोडणकर, शेखर डेगवेकर, दिक्षा मयेकर, वसंत आगशीकर, प्रमय माईणकर, किशोर शास्त्री, राहूल लोटलीकर यांचा समावेश आहे.
शेवटी निर्णय मतदारांच्या हाती
राजकारणात पाठीमागून बोलणारे हे भित्रे असतात, नेता हा सदैव पुढे येऊन कार्य करतो, असे आपण मानतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले अधिकार असतात. विरोधकांनी पॅनल उभे केले तरी शेवटी निर्णय मतदार घेणार आहेत. मतदार हेच खरे पारखी असतात. आपणाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या बळावर सर्वच्या सर्व जागा लढविणार, असे मोन्सेरात म्हणाले.
कोणतीही निवडणूक ही सहज साध्य नसते. तुम्हाला प्रत्येक मतदाराला भेटावेच लागते व आपण किती चांगले आहोत, हे पटवून द्यावे लागते. तसेच आमदार म्हणून आपण पात्र आहे का? याचीही परीक्षा याच निवडणुकीवरून होईल, असेही त्यांनी सांगितले.