अलका लांबा यांचे आव्हान, मोदी, राय यांनी देशाची बिनशर्त माफी मागावी
प्रतिनिधी /पणजी
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना विविध घोटाळे झाल्याचा आरोप करून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे बिंग बाहेर फुटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी देशाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी केली आहे. या आरोपातून सत्ता मिळवणाऱया भाजपाने हिंमत असल्यास आरोप सिद्ध करावेत आणि ते केले तर काँग्रेस पक्ष निवडणुकीतून माघार घेईल, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत लांबा यांनी सांगितले की, विनोद राय महालेखापाल असताना त्यांनी दिलेल्या अहवालातील घोटाळय़ावरून सीबीआय ने प्रकरण नोंदवले होते. त्याच राय यांनी आता तसे कोणतेच घोटाळे नसल्याचे प्रतिज्ञापत्र जारी करून माफीनामा दिल्याने मनमोहनसिंग सरकारविरोधात घोटाळे केल्याचा आरोप म्हणजे षडयंत्र होते हे आता समोर आले आहे, असे लांबा यांनी निदर्शनास आणले आणि विनोद राय यांचे प्रतिज्ञापत्रही पत्रकार परिषदेत सादर केले.
सांखळी मतदारसंघात फक्त काँग्रेस हा एकमेव पक्ष मुख्यमंत्री व भाजपच्या विरोधात लढत देत आहे. तेव्हा पुती गावकर व इतर विरोधी पक्षांनी सांखळीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सुचित केले ते म्हणाले की, भाजपने लोकशाही चिरडून टाकण्याचे काम केले असून तोच पक्ष लोकशाही साजरा करतो हे आश्चर्यकारक आहे. त्या पक्षाला तसे करण्याचा कोणताही अधिकार नाही. जनतेचा कौल नसताना भाजपने मागील दाराने लोकशाहीचा खून करून सत्ता मिळवली. विरोधी पक्षांचे आमदार फोडले. त्या भाजपने लोकशाही साजरी करणे हास्यास्पद आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली.