नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशातील कोरोना स्थितीवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित पाच सुचना केल्या होत्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या पत्रावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पलटवार केला आहे. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी काँग्रेस शासित राज्य जबाबदार आहेत. लोकांचो लसीकरण करण्यापेक्षा लसींबाबत संशय निर्माण करण्यात ते व्यस्त असल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे.
मनमोहन सिंग यांचे पत्र ज्या लोकांनी तयार केले त्यांनी त्यांची विश्वासार्हता खराब केली आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन यांनी दिली. डॉ. मनमोहन सिंगजी, जर तुमचा सकारात्मक पाठिंबा आणि मौल्यवान सल्ला तुमच्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी अशा कठीण परिस्थितीत स्वीकारला तर इतिहास तुमचा आभारी असेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी या पत्राला उत्तर देताना म्हटले आहे की, डॉ. मनमोहन सिंगजी ज्या लोकांनी आपले पत्र तयार केले आहे त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली नाही. 18 एप्रिल रोजी आपण कोरोना लसीच्या आयातीला मान्यता देण्याची मागणी केली होती, मात्र 11 एप्रिललाच ही परवानगी देण्यात आली आहे. यासह, लस उत्पादनात आधीच निधी आणि इतर सवलती सुचविल्या गेल्या आहेत.
भारतात निर्माण होणाऱ्या कोरोना लसींबाबत जगभरात भारताचं कौतुक होत आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वैज्ञानिकांचं आणि लस निर्मिती करणाऱ्यांचे आभार मानले नाहीत किवा स्तुती केली नाही. उलट या काँग्रेस सदस्यांना आणि काँग्रेस शासित राज्यांची याबाबत खोटा प्रचार करण्यात धन्यता मानली आहे, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून देशातील कोरोना परिस्थितीशी सामना करण्यासाठी पाच सुचना केल्या होत्या. कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण आणि औषधांचा पुरवठा वाढवणे महत्वाचे आहे, असं मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटले होते.