- ठाणे सत्र न्यायालयाचे एटीएसला आदेश
ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र एटीएसला आणखी एक झटका मिळाला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचा तपास सुरू होता. मात्र आता हा तपास एटीएसने तात्काळ थांबवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला सोपविला होता. मात्र एटीएसचाही तपास सुरू होता. त्यामुळे एनआयएकडे तपास आलेला असतानाही एटीएस तपास करत आहे आणि आरोपींची कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे सोपवावीत, अशी विनंती करणारी याचिका एनआयएने ठाणे कोर्टात केली होती.
त्यानंतर आज मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवा आणि हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करा, असे निर्देश न्यायालयाने आपल्या आदेशात दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासातली कागदपत्रे एनआयएकडे देण्यासही सांगण्यात आले आहे.
कालच एटीएस ने पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांचा सक्रीय सहभाग होता, असे एटीएसने म्हटले होते. तसेच याप्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, अशी माहितीही दिली होती.