मुंबई / ऑनलाईन टीम
मनसुख हिरेनची हत्या झाली, त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाली. त्यामुळे सध्या सचिन वाझे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी भाजप आमदार रवी राणा यांनी मनसुख हिरेनची जशी हत्या झाली, तशीच हत्या सचिन वाझे यांची देखील होऊ शकते, असा खळबळजनक दावा केला आहे. रवी राणा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून हा दावा केला आहे.
रवी राणा म्हणाले की, ज्याप्रकारे हिरेन यांचा मृत्यू झाला त्यानुसार सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका आहे. ‘मातोश्री’ अडचणीत असून सचिन वाझेंच्या जीवाला धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे. एनआयने पूर्ण लक्ष ठेवून संरक्षण दिलो पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.