ऑनलाईन टीम / मुंबई :
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना मुंबईमधून हाकलवून द्या असा पवित्रा घेत मनसेकडून मुंबईत ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 फेब्रुवारी रोजी घुसखोरांविरुद्ध महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. या विरोधाला राज ठाकरे यांनी पोस्टरबाजी करत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्री बंगल्यासमोर हे पोस्टल लावण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेने वांद्रयातील घुसखोरांनी भरलेले मोहल्ले आधी साफ करा असे आव्हान केले आहे.
मातोश्री समोर लावण्यात आलेल्या पोस्टरवर ‘माननीय मुख्यमंत्री साहेब, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकलंच पाहिजे, हीच आपली भूमिका असेल तर प्रथम आपल्याच वांद्रयातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा.’ असे आव्हान त्यांनी केले आहे.