ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. मुंबईत तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेेव आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन, असेही त्यांनी म्हटले आहे.
- मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ
मुंबईत कालच्या दिवसात 5,504 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. काल दिवसभरात 14 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 2,281 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,80,115 वर पोहचली आहे. तर 3,33,603 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,620 इतकी आहे. सद्य स्थितीत 33 हजार 961 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 75 दिवसांचा आहे.