ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील कोव्हिडचा वाढत्या प्रादुर्भावावर काय उपाययोजना करता येतील ह्यासंबंधी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना एक पत्र लिहिले आहे. ह्या पत्रात राज ठाकरे यांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत.
ते आपल्या पत्रात म्हणाले की, देशात कोव्हिडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिका रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.
कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100 टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
- महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.
- राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
- सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
- लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
- कोविड रोगाचा उपचार करमअयासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.