ऑनलाईन टीम / ठाणे :
भिवंडी येथील खारबाव मालोडी परिसरातील टोलनाका शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा-खारबाव-कामण-चिंचोटी फाटा या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांकडून अनेकवेळह आंदोलने करण्यात आली, निवेदने देण्यात आली तरी देखील या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. याच कारणामुळे शुक्रवारी मनसे सैनिकांनी टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली आहे.
दरम्यान, काल मनसेचे अविनाश जाधव यांनी टोल वसुली बंद करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर टोल वसुली बंद करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी पुन्हा टोलनाका सुरु केल्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले आणि शुक्रवारी दुपारी बारा वाजता मनसैनिकांनी मालोडी परिसरातील टोलनाक्याची तोडफोड केली.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या हातात काठय़ा होत्या, त्यांनी हातातील काठय़ा घेऊन टोलनाक्याची तोडफोड केली. या तोडफोडी दरम्यान कार्यकत्यांच्या हातात मनसेचा झेंडा देखील हातात होते. मनसैनिकांच्या या तोडफोडीमुळे टोलनाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तोडफोड करणाऱया कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टोल वसुली करुनही कंपनी रस्त्याचं बांधकाम चांगल्या पद्धतीने करत नाहीये. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना या खराब रस्त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे कंपनीने आधी रस्ता तयार करुन मगच टोल वसुली करावी अशी मागणी मनसेने केली आहे.