त्या दिवशी शैलाताई अगदी गयावया करतच आल्या. ‘मॅडम, मॅडम चूक झाली माझी. ऐकलं नाही मी..आता काय करावं सुचत नाही. त्यांनी तक्रार केली तर आणि मला पोलिसांनी पकडलं तर?’
‘शैलाताई.. शांत व्हा. इथे कुणीही येणार नाही. तुम्ही इथे बसा पाहू आधी.’ शैलाताईंना खुर्चीत बसवलं आणि पाण्याचा ग्लास हातात दिला. त्यांनी घटाघट पाणी संपवलं आणि दणकन् ग्लास टेबलावर ठेवला.. तसा आपटलाच म्हणा.. शैलाताईंची अस्वस्थता, चिडचिड, त्रागा, सगळं समोर स्पष्ट दिसत होतं. त्यांचा-माझा तसा जुनाच परिचय. परंतु अलीकडे भेट झाली नव्हती. त्यादिवशी समोर आल्या त्या वेगळय़ा मनःस्थितीत.
‘शैलाताई, बरं वाटतय ना?’
‘अं..हो.. हो.’
‘बरं..आता मला सांगा काय झालं आहे? कोण पकडून नेतील?’
‘मॅडम, मागे पहा मी रितेशविषयी तुम्हाला सांगितलं होतं.’
‘हो तुमचा भाचा ना? हो. हो,’
‘त्याचं काय झालं? बरा आहे का तो आता?’
‘कसलं काय..आता त्याला जास्तच भास व्हायला लागलेत. कुणीतरी दिसतं, त्याच्याशी बोलतं म्हणतो..मधेच अगदी शांत असतो. मधेच असं काही झालं की येरझारा घालतो, विचित्र हातवारेही करतो. चेहराच बदलतो त्याचा. काही समजत नाही. काय नाही केलं त्याच्या आईनं..सगळं करून झालं..’
‘शैलाताई, बाकी सगळं राहू दे. तुम्ही त्याला मनोविकारतज्ञांकडे घेऊन गेला होतात का?’
‘अं…ते.. ते’
‘त्याला मनोविकारतज्ञांकडे…………?’
‘नाही.. बाकीचे उपचार केले तिने..’ ‘बाकीचे म्हणजे?’ ‘आम्हाला वाटलं तो कुठेतरी सापडला आहे. बाहेरची बाधा आहे.’
‘अहो, काय हे? त्याच्या आईला, तुम्हाला काय सांगितलं होतं मी? नंबरही दिला होता ना डॉक्टरांचा. अजून उपचारांना सुरुवातही झाली नाही?’
‘मॅडम.. तसं चुकलंच हो आमचं. आणि एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. माझ्या बहिणीला वाटलं लग्न केल्यावर सुधारेल तो..म्हणून लग्नासाठी खटपट सुरू होती. तो ठीक असताना मुलगी पाहिली. दोघांची पसंतीही झाली. नंतर ज्यावेळी पुन्हा एकदा सगळे बैठकीसाठी भेटलो तेव्हा याने अचानक परत तसंच केलं. लग्न मोडलं.. मुलीकडचे लोक चिडलेच आमच्यावर. तुम्ही रागावू नका, पण.. पण..मीच पुढाकार घेतला होता त्यात…’
आता मात्र थोडय़ा वेगळय़ा शब्दात समज देणं गरजेचं होतं. थोडी कानउघाडणी केल्यावर..पुन्हा शैलाताई गयावया करू लागल्या. ‘चुकलं, तुम्ही सांगूनही ऐकलं नाही आम्ही.’
‘हे पहा, प्रश्न मी सांगितले की दुसऱया कुणी हा नाही. यामधे त्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही आयुष्य पणाला लावताय तुम्ही. लक्षात येतंय का तुमच्या?’
‘अं..हो हो.. त्याला उपचारांची गरज आहे. आधी नीट बरा तर होऊ दे तो.’
त्याच्या आईला फोन करा. मला बोलायचं आहे. शैलाताईंनी फोन लावल्यावर मीनामावशींना थोडय़ा कडक शब्दातच समज दिली आणि रितेशला त्वरित मनोविकारतज्ञांकडे नेण्यासंदर्भात सांगितले. दोन दिवसांनी मीनाताईंनी फोन करून उपचारांना सुरुवात झाल्याचे सांगितले. रितेशसारखीच अनेक उदाहरणे पहायला मिळतात.
त्या दिवशी नेहाला घेऊन तिचे वडील आले होते.. नेहाला खूप उदास वाटायचे, तिचे कशातही लक्ष लागत नव्हते. मधेच ती रडू लागायची. कधी अगदी शांत असायची तर कधी अस्वस्थ. अलीकडे तिची भूकही मंदावली होती. तिला कशातच रस वाटेनासा झाला. काही दिवसांसाठी बदल म्हणून नेहाच्या सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवले.
तिच्या माहेरच्या मंडळींना आणि सासरीही असे वाटत होते की ‘एक मूल’ झाले की हे सारे सुरळीत होईल. परंतु नेहामधे झालेला बदल वेगळा आहे हे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले आणि तिने नेहाच्या वडिलांना मला भेटायला सांगितले. नेहा थोडी ठीक असताना तिचे वडील तिला घेऊन आले होते. तिच्याशी संवाद साधल्यानंतर बऱयाच गोष्टी लक्षात आल्या. तिला समुपदेशनासोबतच औषधांचीही गरज होती. तिच्या पतीलाही बोलवून याविषयी सविस्तर बोलणे झाले. नंतर योग्य औषधोपचार, समुपदेशन याची सांगड घालत नेहा त्यातून बाहेर पडली. या क्षेत्रात काम करत असताना अशा अनेक केसेस समोर येतच असतात. काही वेळा लग्न झालं की सुधारेल किंवा एक मूल होऊ द्या मग पहा कसं सगळं सुरळीत होतं ते! अशा पद्धतीच्या समजुती अनेकदा पहायला मिळतात. लग्न झाल्यावर किंवा मुलं झाली की अशा पद्धतीची समस्या सुटेल असं कुटुंबीयांना वाटत असतं.
परंतु लग्न हा मानसिक आजारावरचा उपचार नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. अशा मानसिक स्थितीमध्ये लग्न, नातीगोती हे सारं निभावणं त्याला किंवा तिला जमेल का याचा विचार कुटुंबीयांनी करायला हवा. अन्यथा, अशा निर्णयातून समस्या सुटण्याऐवजी वेगळय़ा समस्या, प्रश्न निर्माण होतात आणि समस्येचा गुंता अधिक वाढत जातो.
मुळातच शरीरासारखं मनही आजारी पडतं हे आजही अनेकांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आलं तरी काहीवेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. लग्न झाल्यावर सुधारेल असं वाटून लग्न उरकून टाकलं जातं. तर काही वेळा आजाराविषयीची, सुरू असलेल्या औषधाविषयी पूर्वकल्पना न देता लग्न केलं जातं, समोरच्या व्यक्तीला हे काहीच माहीत नसल्याने सुरू असलेले उपचार थांबतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अचानक औषधे थांबवली की काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू होऊ शकतो. याबाबत अनभिज्ञ असणाऱया लोकांसमोर अचानक काही गोष्टी येतात आणि मग कशी फसवणूक झाली याचे वाद निर्माण होतात. संसार तर मोडतोच परंतु ज्या व्यक्तीला असा त्रास होत होता तिची परवड होते. तिला अजून वेगळय़ा समस्यांना सामोरे जावे लागते.
अर्थात ज्यांना काही मानसिक विकारांचा सामना करावा लागला आहे त्यांनी लग्न करायचेच नाही असा त्याचा अर्थ नाही. आधुनिक उपचारपद्धती, औषधे, समुपदेशन यांचा योग्य वेळी आधार घेतला तर अनेक केसेसमधे चांगली सुधारणा होते. सुधारणा झाल्यानंतर विवाह करत असताना ज्यांच्यासोबत नाते जुळणार आहे त्या कुटुंबाला सुरू असलेल्या औषधोपचारांची नीट कल्पना देऊन परस्पर संमतीने लग्न झाले तर बऱयाच गोष्टी सोप्या होतात. काही औषधे काही काळ सुरू ठेवायची असतील तर त्यात खंड पडत नाही. परस्पर सामंजस्याने, जीवनाची वाटचाल अधिक उत्तम होण्यास मदत होते. मनोविकार हे औषधे, समुपदेशन या साऱयाने आटोक्मयात येऊ शकतात परंतु त्यासाठी मनही आजारी पडते याचा स्वीकार आणि तज्ञांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे आहे. रोगाचे वेळेवर निदान आणि उपचार या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मनाच्या बाबतीत अधिक सजग होत त्यादृष्टीने वाटचाल झाली तर बऱयाच गोष्टी सोप्या होतील हे मात्र निश्चित!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583