सध्या आधी टेपरेकॉर्डर हा विषयच हद्दपार झाला आहे म्हणा! पण आपल्या लक्षात येण्यासाठी मनाची प्ले लिस्ट म्हणूया हवे तर! तर त्याचे असे आहे की आपल्याला जर कुठलेही गाणे ऐकायचे झाले तर आधी किमान आपला मोबाईल अनलॉक करून किमान यूटय़ूब, गाना वगैरेसारख्या एखाद्या ऍपवर जाण्यासाठी तरी थोडे कष्ट करावे लागतात. यापूर्वीच्या काळात जसजसे पाठी जाऊ तसतसे हे आपल्या आवडीचेच गाणे आपल्याला हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी ऐकणे इतके सोपे नक्कीच नव्हते. टेपरेकॉर्डर बाळगा. तो सेलवर चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यापेक्षाही वाईट. त्यामुळे वीजजोडणी असणाऱया ठिकाणी तो वापरा. त्यात वापरण्यासाठी कॅसेट आणा. त्या कॅसेटना ठेवण्यासाठी बॉक्स शोधा. त्या नीट लावून ठेवा. बुरशी यायला देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका जागी बसून त्या ऐकण्यासाठी वेळ काढा. त्याआधी ग्रामोफोन वगैरेंच्या जगाचा तर विचारच करू नये. अशा त्या काळात मनसोक्त गाणी ऐकणे आणि आनंद लुटणे यासाठी एकच जालीम पर्याय उपलब्ध होता. तो म्हणजे रेडिओ. हा पर्याय तसा दुसऱया अर्थानेही ‘जालीम’! कारण त्यातली प्ले लिस्ट ही ऐकणाऱयाच्या सोयीने ठरवली जाणे हे सर्वथा अशक्मय होते. त्यामुळे मायबाप असलेली आकाशवाणी जे ऐकवील आणि जेव्हा ऐकवील त्यात आनंद मानण्याची एक सवयच जडून गेली होती त्यावेळी लोकांना. एक आवडते गाणे ऐकण्यासाठी चार नावडती गाणी ऐकण्याची मानसिक तयारी आणि संयम आपोआपच ‘डेव्हलप’ होत असे. पण त्यानंतरचा आनंद, ते गाणे येण्यासाठी अपेक्षा करणे. ते जाहीर झाल्यावरची तुडुंब उत्सुकता या सगळय़ात फार फार मजा होती. दिवसभराचे काम आटोपल्यावर किंवा उरलीसुरली झाकपाक करताना गीतमाला ऐकणे आणि त्याचबरोबरीने स्वप्न पहात राहणे हा तत्कालीन स्त्रियांचा अमोल आनंद होता. तर त्यावेळच्या मध्यमवर्गीय नायकाच्या भावना गीतातून ऐकत स्वतःला त्या जागी पाहणे ही पुरुषांची खासियत होती. त्यामुळे अशी मनात साठलेली गाणी काय काय गंमत घडवून आणतात आणि आपला मेंदू त्याचे प्रोसेसिंग आणि साठवण कशा पद्धतीने करतो त्याचे फार मजेदार उदाहरण मला चक्क एका एसटी बसमध्ये भेटलेल्या एका आजीबाईंच्या रूपाने मिळाले.
लांबचा प्रवास होता. दहा तासांचा. त्या आजीबाई सहप्रवासी होत्या. वॉकमनवर मी गाणी ऐकायला काढली होती. आणि आजीबाई एकटक खिडकीतून बाहेर बघत होत्या. थोडय़ाच वेळात मी कंटाळले होते. त्या डिव्हाईसचे सेलही संपले होते. आजी मात्र अत्यंत आनंदाने बाहेरची सृष्टी निरखत होत्या. अगदी बारीक आवाजात मधेमधे गुणगुणतही होत्या. तृप्त शांत समाधानी दिसणाऱया आजींना पाहून मला नवल वाटले. जणू काही माझ्या मनातले ओळखूनच की काय त्या पटकन बोलल्या. ‘आमचं आपलं बरं असतंय. मनाची टेप नि मनाचा रेडिओ… नुसतं ऑन करायचं बघा! लागलीच अगदी हवं ते गाणं सुरू होतंय’ मी बघतच राहिले. मनाचीच टेप आणि मनाचा रेडिओ? किती भन्नाट संकल्पना आहे ही! आजीबाईंनी पुढचीही माहिती देऊन स्पष्ट केली. ‘म्हणजे असं बघ बाळ! खेडय़ातली ही घरदारं ओलांडून पुढे दाट रानातून बस चाललीय. नदीचा आवाज ऐकू येतोय ना? हे दृश्य बघितलं की एकदम ‘रानात सांग कानात आपुले नाते’ आठवतं. गजाननराव वाटव्यांच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष ऐकलं होतं मी! पाठ झालं होतं रेडियोवर ऐकून ऐकून! ते सगळं सगळं मनात वाजतं. नि मग त्यातनं सुरू होतात आठवणींची गाणी! मग काय काय आठवतं गं बाई! ‘दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया’ असा तिनसानचा आठवतो. नि मग ती गाणी एका मागोमाग एक अशी मनात वाजत राहतात. मग कुणी हाक मारली, काही काम निघालं तर मग आमचा मनाचा टेपरेकॉर्डर तेवढय़ापुरता बंद होतो बघ! पुन्हा हात कामाला लागले की सुरू! तुमची ती मशिनं नि वीज, का।़ही लागत नाही आम्हाला! मेंदूची उजळणीची हौस असली की झालं!’ वाह वाह उस्ताद! क्मया बात है महाराजा! गाण्याचे वेड असणारे लोक खूप असतात. पण स्वतःच्या मेंदूला कामाला लावून मनाचाच टेप नि रेडिओ करून हवा तेवढा आनंद तोही पैसाही खर्च न करता घेणाऱयाच्या आवडीला दाद द्यावी की चिकाटीला? खरंच कमाल वाटते. आपण हल्ली भरपूर गाणी ऐकतो. कोणतेही गाणे केव्हाही कुठेही कसेही ऐकतो. सहज उपलब्ध असल्याने त्यातले नाविन्य सरले की काय? मनात येईल ते गाणे दुसऱया क्षणाला स्क्रीनवर दिसते म्हणून आपली उत्सुकता संपवण्याचे काम वेगाने होते आहे काय? केव्हाही आणि कितीही वेळा ऐकता येईल म्हणून आळसावलेला मेंदू पहिल्यासारखा तत्परतेने गाणे टिपतो की नाही? एखाद्या गोष्टीच्या उपलब्धतेप्रमाणे ती वस्तू टिपून जतन करण्याचे मेंदूचे अर्थात मनाचे मार्ग बदलतात? पडू नयेत पण प्रश्न पडतात. कारण अर्थशास्त्राचे पुरवठय़ाच्या व्यस्त प्रमाणात किमतीचे असलेले सूत्र इथेही लागू पडते का हाही एक प्रश्न आहे. इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणाऱयांना प्लेटोची मायमेसिसची थिअरी अभ्यासावी लागते. त्यात त्याने असे म्हटले आहे की प्रत्येक कलाकृतीची मूळ प्रत ही मनःपटलावरच असते. पुढे ज्या बघायला मिळतात त्या खरंतर त्या मूळ प्रतीच्या छाया! मनाच्या याच करामतीचा वापर होतो आणि बनतो मनातला रेडिओ आणि मनातला टेपरेकॉर्डर सुरू होतो.
ऐकायला मजेदार वाटणारी ही छोटीशी गोष्ट खूप काही शिकवून जाते. गाणे म्हणजे नुसता चार सूर आणि चार शब्दांचा मेळ किंवा खेळही नसतो तर गाणे म्हणजे आपल्या स्मृतीत साठवला जाणारा एक सांस्कृतिक संदर्भ असलेला ठेवा असतो. आपण पूर्ण एकटे असलो, जंगलात असलो, आजही जिथे रेंज मिळणार नाही अशा ठिकाणी असलो तर आधुनिक साधनांचा उपयोग होईलच असे नाही. अशावेळी मनातली ही नोंद स्मृतीश्राव्य होते आणि तोच आनंद पुनः पुन्हा मिळवून देते. म्हणून तर गुढीपाडव्याच्या सकाळी अजिबात काहीही ऐकलं नाही किंवा टीव्ही मोबाईल वगैरे जरी ऑन केला नाही तरी अस्सल मराठी गानप्रेमीच्या मनाच्या टेपला गीतरामायण चालू करायची ऑर्डर गेलेली दिसते. त्या धुंदीनेच दिवसाची सुरुवात होते. एकवशी काम करताना मनात आवडीच्या गाण्यांची प्ले लिस्ट आपोआप सुरू होते आणि मग तंद्री लागते. आणि कुणीतरी जागं करेपर्यंत जाग येत नाही त्यातून. एरवी बहिणाबाईंच्या भाषेत ‘खाकसाचा दाना’ असणारे मन एवढे मोठे होते की ‘त्यात आभाय माईना’ होते. आता इतकी सगळी गाणी त्यात राहतात म्हणजे ते मन भव्य असणारच. आणि स्वरांचा परिणामच असा असतो की ते दिव्यही होणारच. आणि याचे मुख्य वैशिष्टय़ असे की त्याला ना काही तयारी लागत की ना कुठला डामडौल लागत. फक्त मनापासून जगत जायचे, डोळे भरून समोरचे जग बघत राहायचे आणि ते रंग आयुष्यात भरत जायचे. बाबा आमटय़ांच्या पुस्तकात अरण्यातल्या त्या आदिवासी पाडय़ावर एका ट्रँझिस्टरवर त्या कुटुंबाने अगदी तेलुगू गाणी ऐकत जगाशी संपर्क ठेवल्याची आठवण सांगितली आहे. आणि तीच गाणी पूर्वी कुठूनतरी ऐकलेले तिथले आदिवासी तिथे आश्चर्याने (आणि भीतीनेही कदाचित) चकरा मारायचे हेही वाचले आहे. मनाच्या टेपची अशी गंमत असते. मन जिथे जाते तिथे तर कुणीही जाऊ शकत नसेल. आणि म्हणूनच मनात गाणे आणि गाण्यातच मन असले की वेगळा रेडिओ किंवा टेप नसला तरी गाणे काही सुटत नाही.
अपर्णा परांजपे-प्रभु – 8208606579