वृत्तसंस्था / मुंबई :
भारतीय संघातून खेळलेला बंगालचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर 10 मी. एअर रायफल नेमबाजी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
34 वर्षीय तिवारी 2004-05 पासून बंगाल रणजी संघातून खेळत असून 12 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्याने 3 टी-20 सामनेही भारतातर्फे खेळले आहेत. त्याला आणखी किमान दहा वर्षे खेळायचे आहे. पण एकदा कारकीर्द संपवल्यानंतर काहीतरी नवी व वेगळे करण्याचा त्याचा मानस आहे. ‘मी तुम्हाला 10 मी. एअर रायफल नेमबाजी करताना आणि ऑलिम्पिकमध्ये खेळतानाही दिसू शकेन. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची माझी खूप इच्छा आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीवर अनेक जबाबदाऱया असतात, याची तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे ही इच्छा पूर्ण करणे सोपे असणार नाही. यासाठी भरगच्च वेळापत्रकातून नेमबाजीसाठी वेळ काढावा लागणार आहे,’ असे तो काऊ कॉर्नर क्रॉनिकल्सशी बोलताना म्हणाला.
क्रिकेटनंतर हा बदल करण्याबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘मला इतर खेळातही प्रयत्नही करून पाहायचा होता, ज्यात शंभर टक्के शारीरिक फिटनेसची गरज असणार नाही. धावावे लागणार नाही, असा क्रीडाप्रकार मला निवडायचा होता. पण हे साध्य करता येईल का, हे पहावे लागेल,’ असेही तो म्हणाला. त्याने हे साध्य केल्यास क्रिकेटशिवाय अन्य क्रीडाप्रकारात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंत त्याचाही समावेश होईल.