प्रतिनिधी /पणजी
रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी)ने काल जाहीर केले की, आगामी गोवा विधानसभेसाठी मनोज परब हे थिवी आणि वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मनोज परब हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे आरजीपीचे अध्यक्ष विश्वेश परब यांनी जाहीर केले.
थिवी हे त्यांचे मूळ गाव असल्याने तेथूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. थिवीची जागा भाजपने जिंकून दाखवावी, असे आव्हान परब यांनी सतीश धोंड आणि सदानंद शेट तानावडे यांना दिले आहे. विश्वजित राणेंनी आयआयटी विरोधातील आंदोलनावेळी दिलेल्या आव्हानामुळे आपण वाळपईतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे मनोज परब म्हणाले. गोव्यातील वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण आणि वाढत्या गुन्हेगारी प्रकरणी त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.
गोमंतकीय जगण्यासाठी संघर्ष करत असताना राजकारण्यांनी बरीच मालमत्ता आणि पैसा हडप केला आहे. त्यांच्या मतपेढीचे राजकारण करत परप्रांतीयांना प्रोत्साहन देत आहे. गोव्याच्या राजकारण्यांनी स्थानिकांना आपले गुलाम बनवले आहे आणि त्यांना आपल्या राजकीय बॉसवर अवलंबून राहायला लावले आहे, असा आरोप परब यांनी केला.
स्थलांतरितांना औद्योगिक वसाहतींमधील नोकऱयांसह हव्या त्या सर्व सुविधा मिळतात. मात्र गोमंतकीयांना नोकऱया मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. दरम्यान, आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी जीएसआरपीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.