रिक्षा चालकांनी धरला ताल
झी मराठीने नव्या नात्यांच्या बांधू गाठी म्हणत ऑगस्ट महिन्यात तब्बल 5 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणून त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर केली. या सर्वच नवीन मालिकांना प्रेक्षकांचं प्रेम आणि उदंड प्रतिसाद मिळतोय. त्यातील एक अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘मन उडू उडू झालं’. प्रेक्षकांचे लाडके कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे या मालिकेतून त्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले. इंद्रा आणि दिपूच्या जोडीवर आणि या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. पण त्याचसोबत या मालिकेच्या शीर्षक गीतावर देखील प्रेमाचा वर्षाव होतोय. अवधूत गुप्ते आणि आर्या आंबेकर यांनी गायलेलं आणि सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडतं. इतकंच नव्हे तर ‘मन उडु उडु झालं’च्या उडत्या चालीवर मुंबईच्या रिक्षावाल्यांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. या गाण्याच्या धूनवर रिक्षा चालकांनी तयार केलेला माहोल सध्या एका व्हिडीओतुन व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यातून मालिकेवर प्रेक्षकांचं असलेलं प्रेम झळकत आहे. या व्हिडीओवर देखील नेटिझन्स आपल्या प्रतिक्रियांमधून मालिका आणि त्याच्या शीर्षकगीतावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.