पंतप्रधानांचे भाषण मग ते जाहीर संमेलन असो विशेष प्रसारण वा समारंभातलं असो अथवा ‘मन की बात’ सारखं मासिक उपक्रमाचे असो या भाषणाला मोठा अर्थ असतो. या भाषणाचे देशात आणि देशाबाहेर परिणाम होत असतात. राजकारण, समाजकारण, अर्थकारण प्रभावित होत असते. या भाषणामुळे सरकारची व देशाची दिशा लक्षात येते. ओघानेच यावर टिका-टिप्पणी होते. समर्थन होते. विरोधही होत असतो. रविवारी पंतप्रधानांनी आकाशवाणीवरुन केलेली ‘मन की बात’ अनेक गोष्टींना नवी ऊर्जा देणारी होती. कोरोना महामारीने घरातच अडकून पडलेल्या आणि महामारीने तडाखे मागून तडाखे खाणाऱया देशवासियांना पंतप्रधानांच्या या भाषणाने नवा विश्वास, नवी ऊर्जा मिळाली आहे. दिवाळीचा आनंददायी, लखलखीत, सुखकारक पहिला प्रकाश दिवा प्रज्वलित झाला. असे म्हणायला हरकत नसावी. पंतप्रधान, राष्ट्रपती वा राष्ट्रीय नेते जे भाषण करतात ते लिखित असते. त्या भाषणातील शब्द न् शब्द आणि विषय पारखून घेतलेले असतात. मनात आले आणि बोलले असे होत नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ, छटा आणि परिणाम तपासून भाषणाची प्रत तयार केली जाते. ओघानेच या आणि अशा भाषणांकडे सर्वांचे लक्ष असते. मोठय़ा नेत्यांची व पदाधिकाऱयांची वक्तव्ये काहीवेळा अंगलट येतात. पण ही भाषणे तयारीने केली जातात. तयारीने अनेक जाणकार ती लिहितात आणि ती योग्य वेळ बघून सादर केली जातात. जगात कोरोनाची साथ पसरली तेव्हा सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचे काय होणार अशी चिंता व्यक्त होत होती. विरोधी पक्ष या संकटकाळातही टीकेचे प्रहार करत हेते. अलीकडे सर्वच राजकीय पक्षाचे सोशल मीडिया सेल आहेत. तेथे प्रशिक्षित व पगारी मंडळी आहेत. काहींचा उल्लेख भक्त असा होतो तर काहींचा भक्त विरोधी असा होतो. रोज नवा विषय ही मंडळी चालवत असतात. महामारीच्या काळातही सरकारला आणि मोदींना सोशल मीडियावर टीकेचे लक्ष करण्यात आले होते. नरेंद्र मोदी त्यावर शांत होते. पण, आजच्या मन की बातमध्ये आणि दोन दिवसापूर्वी जनतेला केलेल्या संबोधनात त्यांनी कुणाचे नाव न घेता अनेक गोष्टींना उत्तर दिले आणि ते परिणामकारक झाले आहे. देशात शंभर कोटी लोकांच्या लसीकरणात यश आले. हाच मोठा आनंदाचा विषय आहे. भारतासारख्य़ा विशाल लोकसंख्येच्या आणि विविध भाषा, धर्म, जाती, श्रद्धा, पक्ष असलेल्या देशात सर्वांना गतीने लसीकरण आणि ते मोफत करणे वाटते तितके सोपे नव्हते. लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का? इथंपासून ही मोदी लस इथंपर्यंत टीका व अपप्रचार झाले. काही लोक अजूनही लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. पण मोदींनी व देशातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणा यांनी टीकेकडे दुर्लक्ष करत लसीकरणाला वेग दिला. गाव खेडय़ापर्यंत, डोंगर दऱयात लस पोहोचवली व शंभर कोटी लसीचा टप्पा पार करत इतिहास रचला. लाल किल्ला आणि देशभरात तिरंगी रोषणाई करत भारताच्या क्षमतेचा, निर्धाराचा आणि यशस्वीतेचा परिचय दिला. लस सुरक्षित नाही, लसीचा तुटवडा, लसीचा काळाबाजार, लस वितरणात दुजाभाव असे अनेक टीकेचे बाण सोडले गेले होते. पण नरेंद्र मोदींनी करुन दाखवले आणि देशाचा तिरंगा उंचावला. शंभर कोटीचा हा टप्पा पार करताना देशाने नवा इतिहास रचला आहे. त्यामध्ये गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना आरोग्य केंद्रात एकच लस आणि ती मोफत दिली गेली. सर्वांची मोबाईल ऍप व आधार कार्डावर नोंद करण्यात आली. लोकांना सजग करण्यात आले मोदींवर आणि भाजपावर जातीय, धार्मिक आणि श्रीमंत वर्गाचा पक्ष अशी टीका करणाऱयांना या लसीकरण मोहिमेने चोख उत्तर दिले. मोदींनी भाषण करताना जे तपशिल दिले त्यातून समजणाऱया सर्वांना सर्वकाही समजले. पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय भारतीयांना आणि आरोग्य कर्मचारी व प्रशासकीय यंत्रणेला दिले. तथापि मोदी हे देशासाठी अठरा-अठरा तास काम करतात आणि कोरोना विरोधी लढाईत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली हे सर्वज्ञात आहे. शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाले असले तरी आपणास एकूण 250 कोटी डोस देण्याचे आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आली असली तरी संपलेली नाही. शंभर कोटी भारतीयांचे लसीकरण झाल्याने थोडा विश्वास निर्माण झाला आहे, लसीकरण हब म्हणूनही भारताची ओळख होते आहे. विदेशी गुंतवणुकदारांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. अर्थव्यवस्था आशादायी होते आहे. पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन शोधले जाते आहे. अनेक आशादायी घटना घडत आहेत. पण अजून अठरा वर्षाखालील सर्वांचे लसीकरण व उर्वरित जनतेला दुसरा डोस यांचे आव्हान आहेच. आम्ही करु शकतो हा विश्वास महत्वाचा आहे आणि या कामगिरीचा देशाच्या आत्मविश्वासासह सर्व गोष्टीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. भाजपाला उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा व मुंबईसह महापालिका निवडणुकीत या कामाचा फायदा शक्य आहे. शंभर कोटी डोस उद्दिष्टय़ पार केल्यावर आनंद आणि अभिमान जरी वाटला तर निर्धास्तपणा किंवा बेपरवाई नसावी कारण महामारी पूर्ण नष्ट झालेली नाही. चीनमध्ये पेशंट वाढत आहेत. जगात अन्यत्र तिसऱया लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सावधानता हवी. कोरोना कुणालाही होऊ शकतो. तो गरीब, श्रीमंत, घराणे, लोकप्रियता बघत नाही. कोरोना टाळायचा असेल तर लसीकरण करुन घेतले पाहिजे. मास्क वापरला पाहिजे. सॅनिटायझरने हात स्वच्छ ठेवले पाहिजेत. मी नियम पाळणार नाही असे झाले तर कुणालाही कोरोना होतो. जग संकटात असताना आपण योग्य दिशेने सुरु केलेली वाटचाल अधिक सामर्थ्यशिल होईल. मन की बातचा तोच अर्थ आहे. तोच संदेश आहे.
Previous Articleअग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला साताऱयातून मिळावा
Next Article कोयना परिसर भूकंपाने हादरला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.