‘लोकल गोईंग ग्लोबल’ मंत्र अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नुकत्याच पार पडलेल्या पाचपैकी चार विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतरच्या प्रथम ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विक्रमी निर्यातीची प्रशंसा केली आहे. स्थानिक उद्योजकांनी निर्मिलेल्या वस्तू आता जागतिक बाजरपेठ व्यापत आहेत. ही ‘लोकल गोईंग ग्लोबल’ ही प्रक्रिया पुढे जोमाने चालविली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारताने इतिहासात प्रथमच 400 अब्ज डॉलर्सच्या (30 लाख कोटी रुपये) निर्यातीचे लक्ष्य 2021-2022 या सध्याच्या आर्थिक वर्षात पार केले आहे. हे लक्ष्य गेल्या अर्थसंकल्पात निर्धारित करण्यात आले होते. ते नियोजित कालावधी आधीच एक आठवडा पूर्ण झाले. या विक्रमाचे श्रेय भारताच्या उद्योजकांचे आणि स्थानिक उत्पादकांचे आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी या विक्रमाची प्रशंसा केली.
भारताची क्षमता असामान्य
निर्यातीचा हा विक्रम केवळ अर्थव्यवस्थेशी संबंधित नाही. तर तो भारताची असामान्य क्षमता दर्शविणारा आहे. गतकाळात भारताची निर्यात कमी 100 अब्ज डॉलर्स तर कमी 200 अब्ज डॉलर्सची होत असे. पण गेल्या चार वर्षांमधील धोरणांमुळे ती 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली आहे. याचा अर्थच असा आहे की भारतनिर्मित वस्तूंना आज जगात मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तसेच भारताची पुरवठा साखळीही आता चांगलीच सक्षम आणि वेगवान झाली आहे, असेही यातून दिसून येते. नुसती स्वप्ने पाहण्यापेक्षा निर्धार हा महत्वाचा असतो हा संदेश या यशातून मिळाला आहे, अशी भलावण त्यांनी केली.
शेतकरी, उद्योजकांचे यश
भारताचे शेतकरी, उद्योजक, हस्तकालाकार, विणकर, इंजिनिअर्स, लघु उद्योजक, मध्यम उद्योजक तसेच विविध उद्योगक्षेत्रे यांनी केलेल्या असामान्य कामगिरीमुळे कोरोनासारख्या संकटकाळातही निर्यात मोठय़ा प्रमाणात वाढली. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील धान्ये, आसाममधील कातडी वस्तू, उस्मानाबाद येथील हातमाग उत्पादने, बिजापूर येथील फळे आणि भाज्या, आंध्रप्रदेशातील आंबा, त्रिपुरातील फणस इत्यादी उत्पादने आज ब्रिटन, अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्टेलिया, डेन्मार्क, जर्मनी इत्यादी समृद्ध देशांना निर्यात होत आहेत. भारताने ही पुरवठा साखळी वेगवान आणि वेळेवर काम करणारी बनविली आहे. त्यामुळे भारताची निर्यात आज कौतुकास्पद वेगाने होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बॉक्स
स्वामी शिवानंदांची प्रशंसा
वयाच्या 126 व्या वर्षीही उत्साही आणि कार्यरत असणारे योगगुरु स्वामी शिवानंद यांची विशेष प्रशंसा पंतप्रधान मोदींनी केली आहे. इतक्या वयातही त्यांची कार्यशक्ती पाहून मी आचंबित झालो आहे. त्यांना नुकताच भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविलेले आहे. त्यांचे शरीर आजही अवघड योगासने करण्यास सक्षम आहे, ही अद्भूत बाब असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
बॉक्स
ई-मार्केट आधारभूत
भारताने व्यापारासाठी अधिकाधिक प्रमाणात आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ई-मार्केट व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जीईएम पोर्टलवरुन 1 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंची खरेदी केली आहे. या माध्यमातून साधारणतः सव्वा लाख लघु उद्योजक आणि लघु व्यापाऱयांनी त्यांच्या वस्तू सरकारला विकल्या आहेत. केवळ मोठय़ा कंपन्यांकडूनच खरेदी करण्याची जुनी परंपरा आम्ही मोडीत काढली. याचा लाभ लक्षावधी लघु उद्योजकांना झाला याचा त्यांनी उल्लेख केला. आयुष या आरोग्य विषयक उद्योगाची उलाढाल अवघ्या सहा वर्षांमध्ये 22 हजार कोटींवरुन जवळपास सात पट (1.40 लाख कोटी) वाढल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
बॉक्स
भारताची आर्थिक भरारी
ड 30 लाख कोटीची निर्यात हे भारताने मिळविलेले अभूतपूर्व यश
ड पुरवठा साखळीची सक्षमता वाढविल्याने वेगवान निर्यातीची सोय
ड ई-मार्केट व्यवस्थेतून लघु उद्योजकांच्या वस्तूंची सरकारी खरेदी
ड कोरोनाच्या संकटाशी दोन हात करतानाही आर्थिक प्रगती शक्य