ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजप पक्षाला नेहमीच आपल्या शिंगावर घेताना दिसतात. भाजपला सडेतोड उत्तरे देताना त्या जराही कसर सोडत नाहीत. भाजपला त्या एकट्या भारी आहेत हे पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय प्राप्त करुन त्यांनी हेच सिद्ध करुन दाखवलंय. केंद्रीय सत्तेलाही त्या वारंवार आपल्या टीकेच्या केंद्रस्थानी ठेवतात. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी याच पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतील, अशी शक्यता म्हणूनच राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. आता या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षावर टीका करत विरोधकांना एकजूट व्हायचं आवाहन ममतांनी केलं आहे.
दरम्यान, भाजप विरोधात एकवटाण्यासाठी ममता बॅनर्जींनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय. त्यांनी या पत्रामध्ये भाजपच्या लोकशाहीवरील थेट हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भाजपविरोधात लढण्याची हीच वेळ असल्याचंही त्यांनी कटाक्षाने सांगितलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच, ” केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजपाने आपल्या देशाच्या सांघिक रचनेवर वारंवार हल्ला केला आहे आणि आता या जुलमी राजवटीचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे.” असे यांनी म्हंटले असून त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रात लिहिले आहे की, “ईडी, सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि प्राप्तिकर विभाग या सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर सूड उगवण्यासाठी, देशभरातील राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी, छळण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून भाजपाला केंद्रीय संस्थांचा गैरवापर करण्यापासून रोखले पाहिजे. निवडणुका जवळ आल्या की केंद्रीय संस्था कामात उतरतात.”