ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांची ‘घरवापसी- पुत्रासह तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल
कोलकाता / वृत्तसंस्था
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. चार वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या दिग्गज नेते मुकूल रॉय यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी पेली. तृणमूल भवनमध्ये झालेल्या पक्षाच्या वरि÷ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला पुत्र सुभ्रांशू रॉय याच्यासह रितसर पक्षप्रवेश केला. आता त्यांच्यापाठोपाठ अन्य काही आमदार आणि नेतेही तृणमूलमध्ये परतण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
विधानसभा निवडणुकीत दणकेबाज विजय मिळवल्यानंतर आता पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नेत्यांचा तृणमूल काँग्रेसकडे ओढा वाढू लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला अनेकांनी सोडचिठ्ठी दिली होती. तृणमूल सत्ता गमावणार असे वाटू लागल्याने अनेक आमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेतले होते. तथापि, निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय चित्र ‘जैसे थे’ राहिल्यामुळे आता तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नेते मुकुल रॉय स्वगृही परतल्यामुळे तृणमूल काँग्रेसचे वजन आणखीनच वाढले आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत ते पक्षात दाखल झाले आहेत. गेल्या पंधरवडय़ात त्यांच्या परतण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. रॉय यांच्यापाठोपाठ आता त्यांचे समर्थक आमदार पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत बंगालमध्ये भाजपला बरेच धक्के बसण्याची शक्मयता आहे. सध्या रॉय यांचा पुत्र सुभ्रांशू यांनीदेखील तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.
सुवेंदू अधिकारी यांच्यामुळे नाराजी
मुकुल रॉय चार वर्षांपूर्वीच ममतांपासून दूर होत भाजपमध्ये गेले होते. भाजपप्रवेशानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. ममता यांच्यानंतर पक्षात त्यांना दुसऱया क्रमांकाचे स्थान होते. तरीही ते ममतांपासून दूर गेले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलमधील नेत्यांची फोडाफोडी करण्यातही त्यांचा हात होता. मात्र, आताच्या निवडणुकीनंतर पक्षात सुवेंदू अधिकारी यांचे प्रस्थ वाढल्याने काही नेत्यांना ठेच पोहोचल्याची चर्चा आहे. ममता सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेतेपदही देण्यात आले आहे. साहजिकच भाजप श्रेष्ठींकडून आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना रॉय यांच्या मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे.