पश्चिम बंगाल पोलिसांचे चौकशीनंतर स्पष्टीकरण
कोलकाता / वृत्तसंस्था
नंदिग्राम येथे बुधवारी ममता बॅनर्जी ज्या घटनेत जखमी झाल्या, ती घटना हा हल्ला नव्हता, तर अपघातच होता, अशी स्पष्टोक्ती पश्चिम बंगाल पोलिसांनी दिली आहे. बुधवारी ही घटना घडल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी या घटनेचा सविस्तर अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यात ही घटना अपघातच आहे, हे स्पष्टपणे नमूद आहे.
या घटनेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रण उपलब्ध आहे. त्यातून ही घटना कशी घडली हे स्पष्टपणे दिसून येते. तसेच पोलिसांनी ही घटना पाहिलेले स्थानिक नागरिक व त्यावेळी उपस्थित असणारे स्थानिक पोलीस यांच्याकडूनही माहिती घेतली. त्यातून हा घातपात नसून केवळ अपघातच आहे, हे सिद्ध होते, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अपघात की घातपात हा वाद मिटला आहे.
घटना कशी घडली
ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. या सुरक्षेसह त्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. अर्ज सादर झाल्यानंतर त्या देवीदर्शनाला गेल्या. तेथून परतताना गर्दीच्या ‘बझार मार्गा’वरून त्यांची कार जात होती. सोबत सुरक्षा व्यवस्थाही होती. कारचा दरवाजा उघडा करून त्या गर्दीला अभिवादन करीत होत्या. त्यावेळी कार हळूहळू पुढे जात होती. त्याचवेळी एका छोटय़ा लोखंडी खांबाला त्यांच्या कारचा उघडा दरवाजा लागला आणि दरवाजा मागे येऊन त्यांच्या पायावर आपटला. त्यावेळी त्यांचा एक पायही थोडा कारच्या बाहेर आलेला होता. त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाली. त्यांच्या कारजवळ कोणीही आले नव्हते. तसेच कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही वस्तूचा अगर साधनाचा आघात कारच्या दरवाजाजवळ किंवा ममता बॅनर्जींवर केला नाही, असा घटनाक्रम या अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे.
मीडियाकडे अहवाल
या अहवालाची प्रत काही वृत्तवाहिन्यांनी मिळविला असून त्यांनी तो प्रसिद्धही केला आहे. त्यामुळे अपघात की हल्ला, या विषयाचे स्पष्ट उत्तर मिळते. व्हिडीओ चित्रणातूनही हे स्पष्ट होत आहे. ज्या स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहिली त्यांनीही खांबाला लागून चालत्या गाडीचा दरवाजा ढकलला गेला आणि तो ममता बॅनर्जींच्या गाडीतून अर्धवट बाहेर आलेल्या पायावर आदळला असेच सांगितले आहे. त्यामुळे आता हा वाद वाढविण्यात अर्थ नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
ही घटना घडण्यापूर्वी काही तास राज्याचे डीजीपी विरेंद्र यांची बदली करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी आणखी एक अधिकारी जावेद शमीम यांचीही बदली करण्यात आली होती. यामुळे बॅनर्जी अस्वस्थ होत्या. त्या उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी करीत होत्या. अधिकाऱयांची बदली झाल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई आली होती, असा आरोपही तृणमूल प्रवक्त्याने केला. या पक्षाचे राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
ममता बॅनर्जींचा आरोप
आपण कारचा दरवाजा उघडून लोकांना अभिवादन करीत असताना चार पाच लोकांनी आपल्याला ढकलले आणि गाडीचा दरवाजा बंद केला. या हल्ल्यामुळे आपण जखमी झालो, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला होता. तृणमूल काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही त्वरित त्याचीच री ओढली होती. तथापि, व्हिडीओ चित्रणातून असे काही घडल्याचे दिसलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
तक्रार सादर
या प्रकरणी पूर्व मेदिनीपूर जिल्हय़ातील पोलीस स्थानकात तृणमूल काँगेसच्या कार्यकर्त्यांनी तक्रार सादर केली आहे. ती भारतीय दंड विधान अनुच्छेद 341 (व्यक्तीला अडकवून ठेवणे) आणि अनुच्छेद 323 (एखाद्याला जखमी करणे) अंतर्गत करण्यात आली आहे. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानेही या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश दिला आहे.
भाजपचा प्रत्यारोप
ममता बॅनर्जींची लोकप्रियता कमालीची घटली आहे. त्यांना त्यांच्या भवानीपूर मतदारसंघातून विजयाची खात्री वाटत नव्हती. म्हणून त्यांनी नंदिग्रामची निवड केली. तथापि, येथे सुवेंदू अधिकारी यांचे वर्चस्व असल्याने तेथेही बॅनर्जींना अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे त्या निराश झाल्या असून त्यांनी जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय नौटंकी सुरू केली आहे. मात्र, लोक अशा नाटकांना भुलत नसतात, हे त्यांनी लक्षात घ्यावे, अशी खोचक टिप्पणी करत भारतीय जनता पक्षाने या घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
घटनेवरून रंगले राजकारण…
- नंदिग्राम घटनेवर भाजप-तृणमूल यांच्यात रंगले शब्दयुद्ध
- याला निवडणूक आयोग जबाबदार : तृणमूलचा आरोप
- पराभवाच्या भीतीने बॅनर्जींचे नाटक : भाजपकडून आरोप