विधानसभेत बरसल्या ः जनमत स्वीकारण्यास तयार नाही भाजप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यास पोहोचलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकावर निशाणा साधला आहे. शपथग्रहणाच्या 24 तासांत त्यांनी (भाजप) केंद्रीय पथक पाठविले. भाजप जनतेचा कौल स्वीकारण्यास तयार नाही. बंगालसोबत इतका भेदभाव का असे प्रश्नार्थक विधान ममतांनी शनिवारी केले आहे.
हिंसेचे कधीच समर्थन करत नाही. भाजपचे लोक बनावट बातम्या आणि बनावट चित्रफिती प्रसारित करत आहेत. निवडणूक आयोगात तत्काळ सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. बंगालमध्ये एक कणा असून तो कधीच झुकत नाही. कटाच्या अंतर्गत येथे सर्व केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले आणि पाण्यासारखा पैसा खर्च केला. हॉटेल आणि विमानावर किती कोटी रुपये खर्च झाले हे मला माहीत नाही असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
तरुण-तरुणींनी आमच्या बाजूने मतदान केले आहे. ही आमच्यासाठी नवी पहाट आहे. तृणमूल काँग्रेसचा हा विजय ऐतिहासिक आहे. बंगालची जनता आणि महिलांमुळे हे शक्य झाले आहे. देशभरात आता एकीकृत लसीकरण कार्यक्रम राबविण्यात यावा. केंद्र सरकारसाठी 30 कोटी रुपयांची रक्कम फार मोठी नसल्याचा दावा ममतांनी केला आहे.
लोकशाहीसाठी लढत राहणार
बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या मोठय़ा विजयानंतर पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेले काही नेते लवकरच परतणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपचे वरिष्ठ आमदार आणि कृष्णानगर दक्षिणचे आमदार मुकुलरॉय विधानसभेतून लवकर बाहेर पडले आणि भाजपच्या विधिमंडळ बैठकीत सामील झाले नाहीत. अशा स्थितीत मुकुल रॉय तृणमूलमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण रॉय यांनी स्वतः ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भाजपचा एक सैनिक म्हणून माझी लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून मुकुल रॉय यांची निवड होऊ शकते.