नंदीग्राम : ऑनलाईन टीम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात नंदीग्रामच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि नंदीग्रामच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोन करुन मतदानावेळी मोठी गडबड केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे ममता यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी जेव्हा बूथवर दाखल झाल्या तेव्हा भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आणि एकमेकांवर आरोप लावले. भाजपचे लोक मतदान केंद्रांवर ताबा मिळवत मतदान प्रक्रिया प्रभावित करत आहेत, असा आरोप तृणमूलकडून करण्यात येत आहे.
याप्रकरणी निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. आतापर्यंत 63 तक्रारी दाखल झाल्या आहेत पण एकाही तक्रारीवर कारवाई झालेली नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी नंदीग्राममध्ये समस्या निर्माण करण्याचे निर्देश दिले होते, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी आंदोलन करत असून मतदान केंद्राच्या दोन्ही बाजूला भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.