समन्स लागू – कोळसा तस्करी प्रकरणात कारवाई
कोलकाता / वृत्तसंस्था
ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांना सीबीआयने कोळसा तस्करी प्रकरणी समन्स दिले आहे. पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना या समन्समुळे ममता बॅनर्जी आणि अभिषेक या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी दुपारी सीबीआय अधिकाऱयांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या घराला भेट दिल्याचे वृत्त आहे. सीबीआय अधिकाऱयांनी रुजिरा यांची त्यांच्या घरातच काहीकाळ चौकशी केली. त्यानंतर त्यांना समन्स देण्यात आले. बॅनर्जी यांच्या पत्नीला कोळसा तस्करी प्रमाणात समन्स पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या आठवडय़ात धाडी
याच कोळसा तस्करीप्रमाणात सीबीआयने गेल्या आठवडय़ात पश्चिम बंगालमध्ये अनेक स्थानी धाडी घातल्या होत्या. तसेच अनेक महत्वाची कागदपत्रे हस्तगत केली होती. पश्चिम बंगालमधील दगडी कोळसा खाणींमधून अवैधरित्या कोळसा काढून त्याची परस्पर विक्री केल्याचे हे प्रकरण आहे. गेली दोन वर्षे या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र, इतक्या प्रमाणात कारवाई प्रथमच होत आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या कंपनीचे महाव्यवस्थापक अमित कुमार धर आणि जयेश चंद्र राय यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल सीबीआयने नोंदवून घेतला होता. नंतर तन्मय दास, कुनुस्तोरिया धनंजय राय आणि देबाशिश मुखर्जी या अधिकाऱयांविरोधातही कारवाई करण्यात आली. या कंपनीने अवैधरित्या कोळसा काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.