ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने 5 लाखांचा दंड ठोठावला आहे. नंदीग्राममधील निवडणुकीसंदर्भात ममता यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करणारे न्यायमूर्ती कौशिक चंदा यांचे भाजपशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांना या खटल्यातून हटविण्याची मागणी ममता यांनी केली होती. न्यायालयाने हे आरोप निरर्थक ठरवत ममता यांना दंड ठोठावला.
नंदीग्राम निवडणुकीच्या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती चंदा यांचे भाजपशी जवळचे संबंध आहेत. त्यांना या खटल्यातून हटविण्यात यावे, अशी मागणी ममता यांनी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने आज सुनावणी करताना ममतांचे आरोप निरर्थक ठरवले. तसेच ममतांनी न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत त्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला.