ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँगेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आज दुपारी 12.30 वाजता भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ममतांना मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे मध्ये झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 213 जागा जिंकून दमदार विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावर असलेल्या ममतांचा नंदीग्राममधून पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. त्यासाठी ममतांनी भवानीपूर मतदारसंघ निवडला असून, तेथील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी ममता आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ममता यांनी यापूर्वी दोन वेळा भवानीपूरमधून निवडणूक जिंकली आहे. मात्र, मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी त्यांना ही निवडणूक महत्त्वाची आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही 30 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. त्याची मतमोजणी 3 ऑक्टोबर रोजी होईल. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी कठोर निकष लावण्यात आले आहेत. तसेच अन्य 31 जागांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या आहेत.