राजभवनातील सोहळय़ात राज्यपालांनी दिली शपथ
कोलकाता / वृत्तसंस्था
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी बुधवारी तिसऱयांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कोरोनाच्या मुद्यावर काम करण्याला सरकारची प्राथमिकता असेल असे स्पष्ट केले. शपथविधीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडक महनीयांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. याप्रसंगी पार्थ चटर्जी, सुब्रतो मुखर्जी तसेच प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील जनतेला राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. बंगालला हिंसा पसंत नाही, त्यामुळे राज्यात शांतता राखणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 292 पैकी 213 जागांवर विजय प्राप्त करत सलग तिसऱयांदा सत्ता पटकावली आहे. भाजपला 77 जागांवर समाधान मानावे लागले असून इतर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे डाव्या आणि काँग्रेसच्या आघाडीला राज्यात एकही जागा मिळालेली नाही. उमेदवारांच्या निधनामुळे दोन मतदारसंघात मतदान घेण्यात आले नसून तेथे पुढील काही दिवसात निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मतदान प्रक्रिया पार पडू शकते.
मोदी-ममतांचे ट्विट-रीट्विट
पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा देत ममतादीदींचे अभिनंदन करण्याबरोबरच संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर ममतांनी पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर दिले. ‘धन्यवाद नरेंद्र मोदीजी, पश्चिम बंगालचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सतत पाठिंब्याची मी अपेक्षा करते. मी माझ्या पूर्ण समर्थनासह आशा व्यक्त करते, की एकत्रितपणे आपण कोरोना साथीच्या आणि इतर आव्हानांशी लढा देऊ आणि केंद्र-राज्यांच्या संबंधात नवीन आदर्श घालून देऊ’, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.