उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का – प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नाचा आरोप
वृत्तसंस्था / कोलकाता
कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बुधवारी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. निवडणुकीशी संबंधित एका याचिकेची सुनावणी करणाऱया खंडपीठामधून न्यायाधीश कौशिक चंदा यांना हटविण्याची मागणी केल्याने ममतांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायाधीश चंदा यांचे भाजपशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
न्यायाधीश चंदा याचे एक छायाचित्र समोर आले असून यात ते भाजप नेत्यांसोबत दिसून येत आहेत. अशा स्थितीत न्यायाधीश चंदा या सुनावणीत सामील असणे योग्य नसल्याचे ममतांनी म्हटले होते.
याप्रकरणी 24 जून रोजी खंडपीठाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. ममतांनी न्यायपालिकेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणत खंडपीठाने बुधवारी दंड ठोठावण्याची कारवाई केली आहे. पण न्यायाधीश चंदा यांनी स्वतःच या खटल्याच्या सुनावणीतून हटण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायाधीश चंदा यांनी ही एक चाल असल्याचे म्हटले आहे. तसेच खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच माझ्या निर्णयावर परिणाम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ठोठावलेल्या दंडाची रक्कम कोरोना काळात जीव गमावलेल्या वकिलांच्या कुटंबांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.
अडचणी निर्माण करणाऱयांना वाद सुरूच ठेवण्याची संधी दिली जाऊ नये. खटल्यासोबत अशी समस्या सुरूच राहिल्यास हे न्यायाच्या हितांच्या विरुद्ध असेल, म्हणूनच या सुनावणीतून अंग काढून घेत असल्याचे न्यायाधीश चंदा यांनी म्हटले आहे.
2 मे रोजी देशातील 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. बंगालमध्ये ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघात भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांच्याकडून 1956 मतांनी पराभूत झाल्या होत्या. निकालाच्या दिवशीच ममतांनी पुनर्मोजणीची मागणी केली होती, पण निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली होती.
त्यानंतर निवडणूक निकालाच्या विरोधात ममतांनी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेत त्यांनी शुभेंदु अधिकारी यांच्यावर निवडणुकीत लाचखोरी, भ्रष्टाचार आणि धर्माच्या आधारावर मते मागितल्याचा आरोप निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती.
भवानीपूर मतदारसंघ रिकामी
नंदीग्राममध्ये पराभवानंतर ममतांनी 7 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ममतांना 6 महिन्यांच्या आत विधानसभेवर जाणे आवश्यक आहे. याचमुळे त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर येथून विजयी तृणमूलचे आमदार शोभन देव चटर्जी यांनी राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जी येथूनच लढणार हे निश्चित आहे. पण कोरोना संकटादरम्यान पोटनिवडणूक कधी होणार हे आताच कुणालाच सांगता येणार नाही.