पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी वाराणसीमध्ये सप नेते अखिलेश यादव यांना पाठिंबा घोषित केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. गुरुवारी वाराणसी शहरात आपण आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याशी धक्काबुक्की केली आणि ‘ममता बॅनर्जी परत जा’ अशा घोषणा दिल्याचा आरोपही त्यांनी केला. तथापि आपण लढवय्या मनोवृत्तीच्या असल्याने अशा हल्ल्यांना दाद देणार नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
या विधानसभा निवडणुकीत सपचा विजय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सपचा विजय झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणेही शक्य होईल, असे भाकित त्यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी अखिलेश यादव यांच्यासारख्या राज्याचा हिताचा विचार करणाऱया नेत्याच्या हाती सूत्रे सोपावावीत, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.