कोलकाता / ऑनलाईन टीम
प. बंगालचा निकाल नाट्यमरित्या दि. 2 मे रोजी अंतिम फेरीपर्यंत अत्यंत चुरशीने पार पडल्याचे पहायला मिळाले. ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्रातील अनेक बडे बडे नेते अशा प्रचारसभा ही या दरम्यान पार पडल्या आहेत. यात तृणमूल काँग्रेसने बाजी मारत प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममतांनी अक्षरशा धुव्वा उडवला आहे. भाजपचे उमेदवार गेल्या पंचवार्षिक पेक्षा अधिक असले तरी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीसाठी घेतलेले परिश्रम पाहता, विजयी आकडा अजून मोठा असणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने भाजपला हा विजय चांगलाच जिव्हारी लागला आहे.
भाजपचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची आज दि. 3 मे रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व आमदारांचा शपथविधी ६ मे रोजी होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. या तृणमूलच्या शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. या समारोहात त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. कोरोनाची गंभीरस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नका, जल्लोष करू नका असं ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.