ऑनलाईन टीम / मुंबई :
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे मध्ये झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 213 जागा जिंकून दमदार विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावर असलेल्या ममतांचा नंदीग्राममधून पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. त्यासाठी ममतांनी भवानीपूर मतदारसंघ निवडला असून, तेथील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही 30 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. त्याची मतमोजणी 3 ऑक्टोबर रोजी होईल. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी कठोर निकष लावण्यात आले आहेत. तसेच अन्य 31 जागांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या आहेत.