ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळीच रोखला असता तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या एवढी वाढलीच नसती, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीनिमित्त एका ऑनलाईन कार्यक्रमात शनिवारी शाह बोलत होते. शाह म्हणाले, दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे वेळीच हा कार्यक्रम रोखून तेथील लोकांना आरोग्य सुविधा पुरवल्या असत्या तर आज देशात कप्रोनाबधितांची संख्या एवढी वाढली नसती.
दिल्ली आणि उत्तरप्रदेश सरकारने मरकजच्या कार्यक्रमामुळेच देशात कोरोना रुग्ण वाढल्याचा दावा केला होता. 25 मार्चपासून देशात पहिला लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्याचवेळी अशा काही घटनांमुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली. मरकजच्या कार्यक्रमामुळे 30 % कोरोना केसेस भारतात पसरल्याचे म्हटले जाते.