कुदेमानी येथे 15 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात : घरोघरी रांगोळय़ा रेखाटून ग्रंथदिंडीचे स्वागत : प्रबोधनात्मक कविता खणखणीत आवाजात सादर
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
कुदेमानी येथील बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. टाळ-मृदंगाचा गजर आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या मुली यामुळे मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन या ग्रंथदिंडीत झाले.
सकाळी दहाच्यादरम्यान विठ्ठल-रखुमाई मंदिर येथून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. प्रारंभी गावडू गुरव यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन करण्यात आले. मल्लाप्पा पाटील यांनी पालखीचे पूजन केले. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीचे उद्घाटन जोतिबा बडसकर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘बोला पुंडलिक वरदे हरीविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा टाळमृदंगाच्या गजरात जयघोष करत ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथ ठेवण्यात आलेली पालखी आकर्षक फुलांनी सजविली होती. गावातील गल्ल्यांमधून दिंडी येऊ लागताच दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. दिंडीच्या मार्गातील गल्ल्यांमध्ये प्रत्येकाने आपापल्या घरांसमोर आकर्षक रांगोळय़ा काढल्या होत्या. भगवे ध्वज घेऊन काही बालके ग्रंथदिंडीत तल्लीन होऊन नृत्य करत होती. काही जणांनी भगवे फेटे परिधान केल्यामुळे गाव अगदी भगवेमय झाले होते.
ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर अश्वारुढ शिवपुतळय़ाचे पूजन यल्लाप्पा गुरव यांनी केले. परशराम गुरव साहित्यनगरीचे उद्घाटन सदानंद धामणेकर यांनी केले. ग्रंथदालनाचे उद्घाटन गावडू पाटील यांनी केले. परशराम गुरव स्मारकाचे पूजन विष्णू जांबोटकर व सूर्यकांत शिंदे यांनी केले. पॉलिहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन डॉ. वंदना गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्य शांताराम पाटील, संत तुकाराम महाराज प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे, शिवप्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्या आरती लोहार, महात्मा ज्योतीराव फुले प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्या रेणुका नाईक, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन कुदेमानी हायस्कूलचे एसडीएमसी अध्यक्ष ईश्वर गुरव, राजषी शाहू महाराज प्रतिमा पूजन ग्रा. पं. माजी अध्यक्ष सुरेश पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन मल्लाप्पा कदम आदींच्या हस्ते करण्यात आले.
कुदेमानी हायस्कूलच्या सभागृहात हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. टी. पाटील होते. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर निमंत्रित कवी, प्रमुख पाहुण्यांसह आर. आय. पाटील, बाळाराम पाटील, आनंद मेणसे, प्रा. निर्मळकर आदी उपस्थित होते.
कुदेमानी हायस्कूलच्या नववी-दहावीच्या विद्यार्थिनींनी ‘शब्द शब्द सुमनांनी गुंफुनी आले, स्वागत पाहुण्यांचे आज झाले’ असे म्हणत स्वागतगीत व ईशस्तवन सुमधूर आवाजात सादर केले. बलभीम साहित्य संघाचे अध्यक्ष पी. एल. गुरव यांनी प्रास्ताविक केले. मराठी भाषेतूनच संस्काराचे बोल मिळतात. या भागात मातृभाषेचे जतन व्हावे, यासाठीच हे साहित्य संमेलन भरविण्यात येते. पश्चिम भागातील रसिकांचे संमेलनाला भरभरून सहकार्य मिळते, असेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
स्वागताध्यक्ष म्हणून राजाराम राजगोळकर उपस्थित होते. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने हा ज्ञानयज्ञ करण्याचे आम्ही ठरविले आणि आज 15 वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी म्हणजे शांती आणि क्रांतीचे प्रतीक आहे. ज्ञानोबा माऊली, तुकोबांची मराठी पुन्हा एकदा तेजाने तळपावी, हाच संमेलन भरविण्याचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलनांच्या माध्यमातून गावची एकात्मता दिसून येते. आम्ही माय मराठीची लेकरे आहोत. भाषा-संस्कृती जतन करण्यासाठीच आमचा लढा आहे. सीमाबांधवांवर प्रशासनाकडून कानडीकरणाचा वरवंटा चालविला जातो. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना मेळावा भरविण्यासाठी कोरोनाचे बंधन लागू होत नाही. मात्र, सीमाभागात भरविल्या जाणाऱया साहित्य संमेलनांसाठी मात्र प्रशासनाकडून कोरोनाचे कारण सांगून इथल्या मराठी भाषिकांना दडपण्याचा प्रयत्न केला जातो, असे जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी सांगितले. भगवा ध्वज हा साधूसंत, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. केवळ भगवे फेटे परिधान करून उपयोग होणार नाही तर आता प्रत्येकाने आपापल्या घरांवर भगवे ध्वज उभारण्याची वेळ सीमाबांधवांवर आल्याचे त्या म्हणाल्या.
मराठी भाषेच्या अस्मितेचा जागर आम्ही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करत आहे. आम्हाला इतर भाषेचा द्वेष नाही. आम्ही फक्त आमच्या मातृभाषेच्या हक्कासाठी लढतो आहे आणि ही रस्त्यावरची लढाई अशीच सुरू राहणार असल्याचेही सरस्वती पाटील यांनी उद्घाटक या नात्याने सांगितले.
साहित्यिक व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. गणपत पाटील, गणपती माळी, निवृत्त मुख्याध्यापक आर. एम. हुलजी, विष्णू जांबोटकर, गावडू पाटील आदींसह नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य व आशा कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन माणिक गोवेकर व राम गुरव यांनी केले. साहित्यप्रेमी नागरिकांसाठी जीवन कालकुंद्रीकर यांनी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.
कविता कवीच्या अंतर्मनाचा आवाज
दुसऱया सत्रात कविसंमेलन झाले. विविध विषयांवर भाष्य करून रसिकांची कवींनी मने जिंकली. कविता ही कवीच्या अंतर्मनाचा आवाज असते. कवी हा आपल्या अवतीभोवतीचे जगणे कवितेतून मांडत असतो. आजूबाजूच्या सौंदर्याकडे, घटनेकडे सुक्ष्म नजरेने तो पाहतो, असे प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी कविसंमेलनाच्या प्रारंभी सांगितले. सुधाकर गावडे यांनी जगण्यासाठी झुंज देणाऱया ‘विठू’ या शेतकऱयाची व्यक्तिरेखा सादर केली. सुनील पाटील यांनी ‘प्रेमकविता’ व ‘तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला माणूस’ अशा दोन कविता सादर केल्या. अशोक आलगोंडी यांनी कवीला जगण्याचे बळ हे कविता देते, असे सांगून सामाजिक प्रबोधन करणाऱया कविता खणखणीत आवाजात सादर करून वाहवा मिळविली.
मातृभाषेचा वारसा जतन करण्याची नैतिक जबाबदारी हवी
समाज आणि संस्कृतीचे सगळे संचित हे मातृभाषेत असते आणि हे संचित एका पिढीपासून दुसऱया पिढीपर्यंत पोहोचविले पाहिजे. मातृभाषेतील साहित्याचा जागर कायम ठेवला पाहिजे. मातृभाषेचा वारसा जतन करण्याची आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असे उद्गार संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. डी. टी. पाटील यांनी काढले. जगातील अनेक विचारवंत मातृभाषेतूनच शिक्षण घ्या, असे सांगतात. मातृभाषेमुळे विचार करण्याची आणि विचार समजून घेण्याची दृष्टी प्राप्त होते. आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्यावर भर द्या. अलीकडे इंग्रजी भाषेचे आकर्षण वाढू लागलेले आहे. मात्र, इंग्रजी ही खिडकी आहे, पण मराठी हे आमचे घर आहे, याचे भान आधुनिक पिढीला करून देणे आवश्यक बनले आहे. विदेशी साहित्यिकांनीही इथल्या संतमहात्म्यांच्या विचारांवर अभ्यास केला आहे. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ संत तुकाराम महाराज सांगतात. समाजातील भोंदू बाबांबद्दल तुकाराम महाराजांनी कडक भाषेत ताशेरे ओढलेले आहेत. अंधश्रद्धा, वाईट वृत्ती या समाजाला घातक आहेत. या उखडून काढल्याच पाहिजेत. समाजाची उन्नती आणि प्रगती ही लेखणीच्या माध्यमातून मांडता येते, असे त्यांनी सांगितले.