ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा हा अंदाज वर्तवण्यात आला असून, 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी विशेष काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करतही यासंदर्भातील माहिती दिली.
‘आयएमडी जीएफएसनुुुुसार 21, 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, द.मध्य महाराष्ट्र, द.कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, असा इशारा देत त्यांनी शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेणे आवशक्य असल्याचे सांगत सर्वांनाच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.