ऑनलाईन टीम / औरंगाबाद
गेल्या काही दिवसांपुर्वी हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार महाराष्ट्र राज्यात पावसाने हजेरी लावली असुन पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात ही पावसाने दमदार सुरुवात केली आहे. प्रामुख्याने राज्यातील मराठवाडा विभागात पावसाने हाहाकार उडाला असुन मुसळधार पावसामुळे अनेक गावांचे संपर्क ही तुटले आहेत. तर सोयाबिन सारखी खरीप पिके पाण्यात वाहून गेली. काही ठीकाणी पिके पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे.
प्रामुख्याने मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच औरंगाबाद शहरात ही पावसाने हाहाकार माजला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात बहुतांश भागात अतिवृष्टीची झाली आहे. उस्मानाबादमधील तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे. मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे ग्रामपंचायत सभागृहात पाणी शिरल्याने १२५ जण अडकले आहे.
इरला येथील प्राथमिक शाळेत १५० जणांना सुखरूप हलविण्यात आले असून पुराच्या पाण्यातून चौघा जणांची तेर येथून सुटका करण्यात आली. तर काही ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि कन्नड या दोन तालुक्यांना पुराचा फटका बसला असून शिऊर-आलापूर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे कोरोनाने कंबरडे मोडले असताना आता हाता -तोंडाला आलेला घास पावसाने हीरावल्याचे मराठवाड्याच्या बहूतांशी भागात चित्र आहे.