प्रतिनिधी / कोल्हापूर
राजकारणापेक्षा समाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी येथे केले. 8 मार्चला मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणार्या सुनावणीवेळी आपले वकील योग्य भूमिका मांडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगफहात बैठक झाली. यावेळी ते कोल्हापूरातून दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हीसी) सहभागी होऊन बोलत होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 मार्च ते 18 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी `व्हीसी’द्वारे बैठक घेतली. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते उपस्थित असल्याने समाधान वाटले. न्यायालयात बाजू मांडताना राजर्षी शाहू महाराज यांची आरक्षणाबाबतची भूमिका सांगायला हवी. मराठा आरक्षणप्रश्नावर लवकरात लवकर युद्ध पातळीवर वकिलांची पुन्हा एकदा बैठक व्हायला हवी.
ऍड. रोहतगी यांचा प्रश्न योग्यच : खासदार संभाजीराजे
इतर राज्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळू शकते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल ऍड. मुकुल रोहतगी यांनी उपस्थित केला आहे. तो अतिशय योग्य आहे, असेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.