ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर आक्रमक धोरण अवलंबण्याचा इशारा दिला आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाची हुकूमी पाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत, त्यांनीच निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला असता ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी उठून मोदींकडे जाऊया. यामध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींची भेट घेतली पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पाने आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे राऊत म्हणाले. हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिला नाही. तो केंद्राच्या कोर्टात गेला आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
- कायदा सर्वांना समान असावा…
दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी लक्षद्वीपमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर भूमिका मांडताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपण जो काही निर्णय घेणार आहोत, तो विचारपूर्वक आणि स्थानिकांना विचारात घेऊनच घेतला पाहिजे. तिथे अस्वस्थता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम आख्ख्या देशाला भोगावा लागतो. या बेटांवर जर कुणी धार्मिक उन्मादाचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचे आहे. जर कुणी विकास करु इच्छित असेल, तर त्याला विरोध करण्याची गरज नाही. पण कायदा सगळ्यांना समान असायला हवा.
लक्षद्वीपमध्ये बीफबंदीचा कायदा तुम्ही आणला. पण इतर भाजपशासित राज्यांमध्ये तशी बंदी नाही. मग फक्त लक्षद्वीपमध्येच असा कायदा लागू झाला, तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच. त्यामुळे राजकीय नेते किंवा प्रशासकीय अधिकारी, या सगळ्यांनीच विचारपूर्वक पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या असंतोषाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.