प्रतिनिधी / कोल्हापूर
महाविकास आघाडी सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळायचे असेल तर खासदार संभाजीराजे यांनी या सरकारचे नाक दाबण्याचे काम करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. आयकर विभागाने इतरांच्या घरावर टाकलेले छापे चालतात, मग तुमच्या घरावर पडलेले छापे सूड उगवण्याचा भाग कसा होवू शकतो. आयकरच्या छाप्यांचे सहा महिने आधी नियोजन केले जाते. ही कॉमन बाब पवार साहेब जाणतात, असा टोलाही चंद्रकांत दादांनी लागावला.
येथील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांतदादांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत याविषयी छेडले असता ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, ही गोष्टी संभाजीराजे यांनी लक्षात घ्यावी. नाक दाबल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाच्या चळवळीला संभाजीराजे यांच्यासारख्या राजकीय पक्ष विरहीत नेतृत्वाची गरज आहे. मराठा समाज त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. मराठा आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपने रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यामध्ये इतर संघटनांही होता. भाजप राजकीय पक्ष असल्याने चळवळीकडे राजकीय हेतूने पाहिले जाते. त्यामुळे संभाजीराजेंसारख्या राजकारणाच्या पलिकडे जावून कार्य करणाऱया नेतृत्वाची गरज आहे.
आपल्या नातेवाईकांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर पवारांनी राजकीय हेतूने केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका केली आहे, याविषयी विचारले असता चंद्रकांतदादा म्हणाले, आयकर विभाग कुणावर छापे टाकणारे याचे नियोजन सहा महिने आधी होते. ही बाब पवार साहेबही जाणतात. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप येण्याचा प्रश्नच नाही. पण केंद्रीय यंत्रणांवर जर पवार साहेब टीका करत असतील, तर त्याचे उत्तर त्या यंत्रणांचे अधिकारी प्रेसनोट काढून देतील.
शेतकऱयांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली
पूरग्रस्त शेतकऱयांना 11 हजार कोटी जाहीर करून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप चंद्रकांतदादांनी केला. ते म्हणाले, 2019 मध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने काढलेल्या आदेशाचे पालन महाविकास आघाडी सरकारने करावे, अशी राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱयांची मागणी आहे. फडणवीस सरकारने पूरग्रस्तांना कर्जमाफी व नुकसानीच्या तिप्पट मदत दिली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने एनडीआरएफच्या अहवालानुसार 18 हजार असूनही 15 हजार रूपये, आणि नारळ, आंब्याच्या शेतकऱयांना 25 हजारांची मदत दिली आहे. जिरायती शेतीला साडेसहा हजार रूपये मदत जाहीर केली आहे. यामध्ये शेतकऱयांचा पेरणीचा खर्चदेखील निघत नाही.
राऊत महाभारतातले संजय आहेत
महाविकास आघाडीच्या महिला नेत्या कोठे गेल्या? या तुमच्या प्रश्नावर महिला नेत्या आपआपले काम करीत आहेत, चंद्रकांतदादा पाटील यांचे म्हणणे कुणीही गांभीर्याने घेत नाही, या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले, राऊत यांना अदृश्य डोळे आहे, कारण ते महाभारतातील संजय आहेत. म्हणून त्यांना धुतराष्ट्राला जे दिसल नाही ते सर्व राऊत यांना दिसते. ते फार मोठे व्यक्तीमत्व आहे.
चित्रा वाघ पुर्वीच्या अनुभवावर बोलल्या
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड झाली आहे. यावर चित्रा वाघ यांनी रावणाला मदत करणाऱया शुर्पणखा अशी टीका केली आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले चित्रा वाघ या पुर्वीच्या राष्ट्रवादीतील अनुभवावर बोलल्या असतील. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण पाहता हे पद भरण्याची गरज होती. उशिरा का असेना रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली हे महत्वाचे आहे.
ड्रग केंद्रीय यंत्रणा उत्तर देतील
ड्रग संदर्भातील कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी माझ्यावर आरोप केलेला नाही. कारवाई करणाऱया केंद्रीय यंत्रणेवर आरोप केला आहे, ती यंत्रणा प्रेसनोट काढून उत्तर देईल, मी त्या यंत्रणेचा अधिकारी नाही, असेही चंद्रकांतदादा यांनी सांगितले.