ऑनलाईन टीम / नाशिक
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होत पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलनाची हाक दिली. या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सूरुवात झाली. यानंतर आज, 21 जूनला नाशिक येथे मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाने आपला आक्रोश व्यक्त केला आहे. आम्ही बोललो आहोत. आता लोकप्रतिनिधींनी आपलं मत व्यक्त करत आपण समाजासाठी जबाबदारी घेत काय घेणार आहात ? हे स्पष्ट करावं अशी भूमिका घेतली.
कोल्हापूरातील मोर्चानंतर राज्यशासनाने मराठा समाजाला चर्चेसाठी आवाहन करीत चर्चेतूनचं मार्ग काढला जाऊ शकतो अशी भूमिका घेतली होती. यानंतर सरकारने याप्रश्नी बैठकही घेतली. मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यानंतर काही मागण्या राज्यशासनाने मान्य करत तातडीने निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र संभाजीराजे यांनी मूक आंदोलने न थांबवता हे आंदोलने सूरु ठेवले आहे. याचाच भाग म्हणून आज, नाशिक येथे हे मूक आंदोलन झाले.
यावेळी संभाजीराजे यांनी आपण आता बोलणार नाही. जे समन्वयक येथे आले आहेत ते संपुर्ण मराठा समाजाचे घटक आहेत. त्यांना एक विनंती आहे की, आपण पुकारलेले आंदोलन हे मुक आंदोलन असून समाज बोलला आहे, आम्ही बोललो आहे, आता फक्त लोकप्रतिनिधींनी आपलं मत व्यक्त करावे, पक्षाची भूमिका काय ते न बोलता लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय देण्यासाठी काय करू शकता, समाजाची कोणती जबाबदारी घेणार, हे सांगावं. या वेळी समन्वयकांनी आणि इतरांनी कोणते ही उलट प्रश्न लोकप्रतिनिधींना करू नयेत अशी विनंती केली.