निवेदन देण्यास गेलेल्या मराठा कार्यकर्त्यांना अटक
मुंबई / प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना तातडीने या पदावरून हटण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. बुधवारी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यासाठी चव्हाण यांच्या येथील मेघदूत या शासकीय बंगल्यावर गेले होते. त्यावेळी चव्हाण यांनी कोरोनाचे कारण सांगत अटी घातल्या. त्यामुळे संतापलेल्या मराठा समन्वयकांनी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांमार्फत निवेदन चव्हाण यांना देवून मराठा समन्वकांनी त्याची पोच घेतली. दरम्यान, चव्हाण यांच्या कृतीचे राज्यभर संतप्त पडसाद उमठले असून त्यांचा निषेधही केला जात आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय दीड वर्षात सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला नाही. राज्य सरकारने दाखल केलेल्या पुर्नर्विचार याचिकेवर निर्णय झालेला नाही, भोसले समितीच्या शिफारशी राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या नाही. राज्य मागास आगोयावर दोन मराठा सदस्य घेण्याची मागणीही पूर्ण केलेली नाही, कोपर्डीची केस उच्च न्यायालयात दाखल करतो असे चव्हाण म्हणाले होते. मात्र त्या प्रकरणात काहीही हालचाल नाही. त्यामुळे आम्ही आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना फोन करून मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्याबाबत माहिती दिली होती. तरीही चव्हाण यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज आम्ही चव्हाण यांच्या शासकीय बंगल्यावर निवेदन देण्यासाठी गेलो.
निवेदन देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे यांच्यासह आप्पासाहेब कोडेकर, करण गायकर, धनंजय जाधव, किशोर मोरे, माधव देवसरकर, गंगाधर काळकोटे, रघुनाथ चित्र, नरेश मोरे यांच्यासह 25 समन्वयक चव्हाण यांच्या मेघदूत बंगल्यावर गेले होते. पण कोरोनाचे कारण सांगत चव्हाण यांनी केवळ पाच जणांना येण्यास सांगितले. आंदोलकांनी आम्ही राज्यभरातून एवढय़ा दूर आलो आहोत, किमान अकराजणांना तरी आत घ्या, अशी विनंती चव्हाण यांना केली. पण चव्हाण यांनी त्यास नकार दिल्याने अखेर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बंगल्याच्या दारातच घोषणाबाजी सुरू केली. चव्हाण निवेदन स्वीकारणार नसतील तर आम्हाला अटक करा, पण आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी समन्वयकांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले. तेथून मागण्यांचे निवेदन पोलिसांमार्फत चव्हाण यांच्याकडे पाठवून पोच घेण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास नकार देण्याच्या चव्हाण यांच्या कृत्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी लोकशाही मार्गाने निवेदन देण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांबाबत चव्हाणांचे वर्तन मराठा समाजाचा अवमान करणारे असल्याची प्रतिक्रिया देताना पुन्हा सर्व मागण्यांसाठी मराठा समाज एल्गार करेल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक. चव्हाण यांनी आपली जबाबदारी झटकून, शांततेच्या मार्गाने समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अशी वागणूक देणे, हे कितपत योग्य आहे ? या संदर्भात चव्हाण आणि राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.