- लोकसभेत विनायक राऊत कडाडले
ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार विनायक राऊत आज लोकसभेत चर्चेदरम्यान आक्रमक पहायला मिळाले. त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सडेतोड मत मांडत केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. तसेच यावेळी त्यांनी लोकसभेत 127 व्या घटना दुरुस्तीवर चर्चा सुरु असताना त्यांनी परखड मत मांडले. केंद्र सरकारकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षण रखडले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी लावला.
पुढे ते म्हणाले, देशातील सर्व राज्यांना विकलांग करायचे आणि सत्ता केंद्रीभूत करण्यासाठी 102 वी घटनादुरुस्ती केली आहे. मंत्री महोदयांनी हे मान्य देखील केले आहे. त्यानंतर जे काही घडले त्याबाबत बोलताना सर्वोच्च न्यायालयाने केंद सरकारला म्हटले की, 102 वी घटना दुरुस्ती करून तुम्ही संपूर्ण देशातल्या आरक्षित समाजात समाजावर अन्याय केलेला आहे. आता 105 वी घटना दुरुस्ती आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. आगीतून फोफाट्यात टाकायचे अशी आमच्या मराठीत म्हण आहे. 102 व्या घटना दुरुस्तीने उद्ध्वस्त केले. मात्र 105 व्या घटना दुरुस्तीने नेमके काय दिले ? असा सवाल देखील विनायक राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
ते म्हणाले, विधेयक ज्या वेळेला आले, त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व समाजाला वाटले की, केंद्र सरकारने विश्वासघात केला. हे माझे मत नाही. मी म्हणतो बरं झालं हे विधेयक आणले. पण हे अपुरे आणलेले आहे. जेवायला वाढताना केवळ चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट ठेवले. पण त्या ताटात काहीच नाही. मीठ नाही, लोणचं नाही, पंचपक्वान्न सोडा. खायचं काय त्या ताटातून ? राज्यांना खूप काही दिले, असे मंत्री म्हणत आहेत. पण नेमका कोणता अधिकार दिला ? मराठा समाज असो वा गुर्जर समाज त्यांच्या आरक्षणासाठी कोणती तरतुद केली. हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी देखील राऊत यांनी यावेळी केली आहे.