राज्यातील मराठा समन्वयक, तज्ञांशी चर्चेनंतर `वर्षा’वर बैठकीला जाण्याचा निर्णय ः खासदार संभाजीराजे यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गुरूवारी बैठक घेण्यासंदर्भात नियंत्रण पाठविले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बैठकीचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही गुरूवारी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासंदर्भात फोन आला. त्यांच्या सौजन्यशिलतेचा आदर, सन्मान ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे राज्यातील मराठा समन्वयक आणि तज्ञांशी चर्चा करून गुरूवारी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीला वर्षां बंगल्या जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापूरसह राज्यातील मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची बैठक घेऊन सरकारकडून बैठकीबाबत आलेल्या प्रस्तावाची माहिती दिली.
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, आजतागायत विविध न्याय मागण्यांबाबत मराठा समाजाने आपली भूमिका मांडली आहे. राज्यातील समन्वयकांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता तीच भूमिका घेऊन आणखी किती वर्षे जायचे म्हणून लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडावी म्हणून 36 जिह्यात आंदोलन करण्याचे आमचे नियोजन होते. पुणे ते मुंबई लाँगमार्चदेखील काढला जाणार होता. पण आंदोलनस्थळी येऊन पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ या दोघांनी बैठकीचा प्रस्ताव दिला आहे. आरक्षणाव्यतिरिक्त ज्या मागण्या राज्यसरकारच्या अखत्यारित आहेत, त्या बैठकीद्वारे मार्गी लावण्याबाबत राज्यसरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्तावाचे स्वागत, पण समाधानी नाही
पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीच्या प्रस्तावाचे स्वागत करतो. पण त्यामुळे आम्ही समाधानी नाही. जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत राज्यसरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा संभाजीराजे यांनी दिला. कोविडची परिस्थिती पाहून काय बजेट आहे ? आणि मराठा समाजासाठी यावर्षी किती निधीची तरतूद केली जाणार ? पुढील वर्षी किती देणार ? याचा पुर्ण अभ्यास केल्याशिवाय आपण समाधानी झालो असे म्हणता येणार नाही. राज्यसरकारकडे मागण्या सादर केल्या आहेत. तरीही त्यामधील कायदेशीर बारकाव्यांचा अभ्यास करावा लागणार आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
… तर मी मॅनेज झालो म्हणून शिक्का मारतील
मुंबईमध्ये बैठक घेऊन चर्चा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 4 जून रोजी फोन आला होता. पण मराठा समाजाच्या मागण्या मी अगोदरच जाहीर केल्या आहेत. त्यामुळे मी एकटा भेटून काय करू ? उद्या मी मॅनेज झालो म्हणून माझ्यावर शिक्का मारला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक चर्चेदरम्यान हवेत असे स्पष्ट करून त्यांना नकार दिल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
केवळ विरोध म्हणून आंदोलनाची गरज नाही.
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्यसरकारने चर्चेला बोलावले आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करतो. सरकारने मागण्या मान्य केल्या तर आम्हाला पुढील आंदोलन करण्याची गरज नाही. उगाच विरोध म्हणून आंदोलन करणार नाही. आज सरकारच्या खिशातच दहा रूपये असतील तर आम्हाला नऊ रूपये द्या असे म्हणणार नाही. पण त्यामधील किमान दोन रूपये तरी सरकारने मराठा समाजासाठी द्यावे अशी आमची भूमिका आहे. जशा आमच्या रास्त मागण्या आहेत, त्या मंजूर देखील रास्त पद्धतीने करून घेणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या राज्यातील सर्व समन्वयकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. यातून निश्चितपणे मार्ग काढू. पण मी एकटा जाणार नाही. तज्ञ आणि अभ्यासू लोकांनी माझ्यासोबत घेऊन बैठकीला जाणार आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाचा वेगळा लढा असून तो सुरुच राहणार आहे. आरक्षणाव्यतिरिक्त इतर मागण्यांबाबत राज्यसरकारकडून योग्य निर्णय घेतला नाही, तर लाँगमार्चचा शेवटचा पर्याय आहे. -खासदार संभाजीराजे छत्रपती