ऑनलाईन टीम / पुणे :
मराठा आरक्षण हे नियमबाह्य असल्याचे सांगत राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुण्यातील मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यातील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. सर्वोच्च न्यायालय आरक्षणाच्या बाजूने निकाल देईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची होती. पुण्यात नवी पेठ येथे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी यांनी काळ्या फिती बांधुन मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. या निर्णयाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
‘एक मराठा… लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या सरकारचे करायचे काय?, खाली डोकं वर पाय, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ अशा अनेक घोषणा नवी पेठ येथे जमलेल्या मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, रघुनाथ चित्रे, बाळासाहेब आमराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
- मराठा समाजातील प्रत्येकासाठी काळा दिवस
मागील 32 वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी झगडतो आहे. यामध्ये तरुणांचे मोठे नुकसान होत आहे. आता बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही. मराठा समाजातील प्रत्येकासाठी हा दिवस काळा आहे, असे म्हणत मराठा समजतील तरुणांनी शहरात कळ्या फिती लावून आंदोलन केले.
दरम्यान, राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे.