३ जून रोजी कोल्हापुरात बैठक: आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
प्रतिनिधी / इस्लामपूर
आरक्षण संदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. विविध तरतूदींचा अध्यादेश जारी करुनही शासनाने एकाही गोष्टीची पुर्तता केलेली नाही. आरक्षण आमच्या हक्काचे असून ते घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी येत्या ३ जून रोजी कोल्हापूर येथे बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील व मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडीक यांनी दिली.
ते म्हणाले, राज्य शासनाकडून मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे. या विरोधात पुन्हा एकदा मराठा समाज एकवटला असून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेतली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये मराठा समाजाची गोलमेज परिषद होऊन त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु तत्पूर्वीच मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन आंदोलन स्थगित ठेवण्याची विनंती केली.
त्याचवेळी न्यायालयीन लढाई जिंकून आरक्षण देण्याचे मान्य करताना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी ५०० कोटी रुपये दिले. शिवाय ‘सारथी’साठी १८० कोटी रुपयांची तरतूदीसह मराठा समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी, विद्यार्थ्यांना फी चा परतावा, आरक्षणाच्या आंदोलनात प्राणांचे बलिदान देणार्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व आरक्षण आंदोलनकर्त्यांवरी सर्व गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील कॅबिनेट मंत्रीमंडळात निर्णय करुन तसा जीआरसुध्दा पारीत केला. परंतु आजतागायत यापैकी एकाही तरतूदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. ते प्रश्न आजही तसेच प्रलंबित असून न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न टिकवू शकले नाही. योग्य मांडणी आणि योग्य वकिल न दिल्याने आरक्षण रद्दबातल झाले आहे.आता ‘आर या पार’ लढाई करणार असा इशारा पाटील व महाडिक यांनी दिला.