मराठा समाज सचिव आप्पासाहेब मोरे यांचे मत : संकेश्वर येथे पत्रकार परिषद : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत
प्रतिनिधी / संकेश्वर
कर्नाटकात विखुरलेला समाज एकत्र येऊन विकास घडावा, या उद्देशाने येडियुराप्पा सरकारने मराठा विकास निगम स्थापन केले. तसेच 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याने समाजास स्थैर्य लाभेल, हा निर्णय अभिनंदनीय आहे, असे मत मराठा समाजाचे सचिव आप्पासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. ते मराठा विकास निगम स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर शंकरलिंग समुदाय भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनूरी होते.
मोरे म्हणाले, राज्यात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद वगळता समाज एकवट नव्हता. आज येडियुराप्पांनी चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे चित्र वेगळे दिसत आहे, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, आम्हास भाषेची अडचण नसून आम्ही कर्नाटकातील मराठे आहोत. तंजावरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तर शहाजीराजे बेंगळुरात राज्यकारभार पाहिल्याचा इतिहास आहे. ही बाब पहाता खऱया अर्थाने स्वराज्याचा पाया हा कर्नाटकातच घातला गेला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सर्व बाबी पहाता राज्य सरकारने मराठा निगमला मान्यता दिल्याने शासनाचे अभिनंदन असे त्यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष अमर नलवडे यांनी, मराठा निगममुळे समाजाला लाभ मिळेल. कारण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात वाव मिळणार आहे. निगमवर तालुक्यातील समाज बांधवांना प्रतिनिधीत्व मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. निगमच्या पाठपुराव्यास मुख्यमंत्री येडियुराप्पा, वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार उमेश कत्ती यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे, असे सांगितले. माजी नगरसेवक एल. पी. शेंडगे म्हणाले, राज्य सरकारने 50 कोटीच्या निधीची घोषणा केल्याने समाजाच्या विकासाला चालना मिळेल. परिणामी मराठा समाज यानिमित्त एकत्र
येईल. ऍड. विजय थोरवत यांनी येडियुराप्पा यांचे लक्ष मराठा समाजाकडे गेल्याने राज्यात बहुसंख्येने पण विस्कळीत असलेल्या बांधवांना एकत्र येण्यास संधी मिळाली आहे. तसेच पुष्पराज माने यांनी कर्नाटक शासनाच्या निर्णयाचे अभिनंदन करून तत्कालीन मुख्यमंत्री कै. देवराज अर्स व निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील आपल्या राजकीय कार्यकाळात मराठा समाजासाठी योजना राबविण्यास पाठपुरावा केला होता, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत उद्योजक अभिजीत कुरकणर, भाऊसाहेब पाटील, राजू जाधव, विष्णू जाधव, प्रभाकर देसाई, विलास माने, राजेश गायकवाड, दीपक भिसे उपस्थित होते. स्वागत व आभार जयप्रकाश सावंत यांनी मानले.