प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातील विविध अशा 18 महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि हात धुणे याबाबत पथनाटय़ाद्वारे जनजागृती केली.
कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी ऑक्सिजन सिलिंडरसह पथनाटय़ सादर केले. ऑक्सिजन नसल्याने रुग्णाला कसा त्रास होतो? याचे सादरीकरण त्यांनी केले व ज्या लोकांनी मास्क परिधान केला नव्हता त्यांना चॉकलेटसह मास्क देऊन विनंती करण्यात आली. राणी चन्नम्मा सर्कल ते उद्यमबागपर्यंत विद्यार्थ्यांनी पथनाटय़ सादर केले. त्यांना प्रा. बाळाप्पा, प्रा. अनंत घाडी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, कोविड-19 चे नियम आपण गांभीर्याने पाळले पाहिजेत. याचसाठी कॉलेजने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पोलिसांचे सहकार्य व अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभल्याचे त्यांनी सांगितले.