महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजन, केंद्र सरकारचा करणार निषेध : सीमालढा तीव्र करण्याचा निर्धार
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक 65 वर्षांपासून आपल्या न्याय-हक्कासाठी लढत आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवार दि. 1 नोव्हेंबर रोजी हरताळ पाळण्यात येणार आहे. तसेच रेल्वे ओव्हरब्रीज येथील मराठा मंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले व्यवहार बंद करून केंद्र सरकारचा निषेध करावा, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
1 नोव्हेंबर 1956 ला भाषावार प्रांतरचना झाली. यावेळी बेळगावसह मराठी बहुल सीमाभाग म्हैसूर प्रांताला जोडण्यात आला. यामुळे बेळगाव शहरासह 865 खेडी म्हैसूर प्रांतात समाविष्ट करण्यात आली. भौगोलिक व ऐतिहासिकदृष्टय़ा महाराष्ट्रात असणारा भाग कर्नाटकात डांबण्यात आल्याने संघर्षाला सुरूवात झाली. तेव्हापासून आजतागायत आंदोलने, मोर्चा, सत्याग्रह यांच्या माध्यमातून सीमाभागातील नागरिकांनी सीमाप्रश्न धगधगता ठेवला आहे. ज्या दिवशी संपूर्ण कर्नाटकात राज्योत्सव केला जातो त्याच दिवशी बेळगावमध्ये काळे कपडे परिधान करून निषेध मोर्चा काढला जातो.
कोरोनामुळे यावर्षी सायकलफेरी काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील वषीप्रमाणे मराठा मंदिर येथे धरणे धरण्यात येणार आहेत. मराठी भाषिकांवर वर्षानुवर्षे होणाऱया अन्यायाचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी उपस्थित राहून निषेध नोंदवायचा आहे. तसेच सीमालढा अधिकच तीव्र करावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती, शहर समिती, तालुका समिती, युवा समिती, महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.