प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असे मुला-मुलींचे दोन वसतिगृह प्रश्नी फसवणूक झाल्याची समाजाची भावना आहे. वसतिगृह चालवण्यासाठी भाडे पट्ट्याचा अकरा लाखाचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यापूर्वी भाजप-शिवसेना युतीच्या काळात तीन वर्षे वस्तीगृह चालवण्यात आले. मात्र त्याचा खर्च स्थानिक आमदार करत होते. शासकीय निधीची तरतूद न केल्याने ही वसतीगृहे बंद पडली. त्यांचा निधीही नंतर देणे खूप अडचणीचे झाले. आता आघाडी सरकार येऊन वीस महिने झाले. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. मंत्रिमंडळ उपसमितीत झालेल्या निर्णयाप्रमाणे सांगली जिल्ह्यात दोन वसतिगृहे सुरु करण्यासाठी मिरजेच्या महापालिका शाळा क्रमांक दोन आणि अण्णाबुवा शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्यावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 ऑगस्टला त्याचे उद्घाटन केले जाईल असे शासनाने सांगितले होते.
मात्र तसे घडले नाही. आता घोषणा होऊन तीन आठवडे झाले तरी कोणतीही कारवाई नाही. वसतीगृह चालविण्यास तयार असलेल्या स्वयंसेवी संस्थेची महापालिकेला 11 लाख रुपये भाडे पट्ट्या देण्याची आर्थिक स्थिती नाही. शासनाने जिल्हा नियोजन मंडळ किंवा स्वनिधीतून ही रक्कम द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याने मराठा समाजामध्ये फसवणूक झाल्याची भावना असून आघाडी सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढावा आणि वसतिगृहे सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राज्य समन्वयक संजय पाटील, विलास देसाई यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.