वन व अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांची माहिती : मराठा समाज मेळाव्याचे संकेश्वरात उद्घाटन : विविध स्वामीजींसह मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी /संकेश्वर
कर्नाटक राज्यात मराठा समाजबांधवांची संख्या अधिक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मराठा समाज अभिवृद्धी निगमसाठी 50 कोटींचा निधी दिला आहे. यापुढेही समाजाच्या उद्धारासाठी राज्य शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे वन व अन्न-नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.
सोमवारी संकेश्वर येथील मराठा समाज मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बेंगळूरच्या श्री गोसाई महासंस्थान मठ, भवानी पीठ गवीपूरमचे जगद्गुरु वेदांतचार्य मंजुनाथ स्वामीजी होते, तर शंकराचार्य संस्थानमठ संकेश्वर-करवीरचे जगद्गुरु सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. मंत्री कत्ती पुढे म्हणाले, आगामी शिवजयंतीपूर्वीच संकेश्वरात भव्य शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मराठा समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण सुरुवातीपासूनच प्रयत्न करीत आहोत. यापुढेही समाजाच्या पाठिशी खंबीरपणे राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ तसेच छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्षा सीमा हतनुरी, जि. पं. माजी सदस्या सुमित्रा उगळे, ऍड. बाळासाहेब यादव, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, अमर नलवडे, अथणीचे श्रीनिवास पाटील, निपाणीचे श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, नगरसेविका श्रीविद्या बांबरे, समाजाचे अध्यक्ष आप्पा मोरे व उपाध्यक्ष सुभाष कासारकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक महिलेने जिजाऊ बनावे
मराठा समाजाची प्रगती होण्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, शिक्षणामुळे शिस्त व व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी मदत होते. आपल्या डोळय़ासमोर जिजाऊ, शिवाजीराजे, संभाजीराजे यांचा पराक्रमी इतिहास आहे. या इतिहासाची आठवण करून देत भावीपिढीला शिवकाळ समजून देत कर्तबगारीपणा त्यांच्या अंगी बाळगला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक महिलेने जिजाऊ बनावे, असे विचार कारदग्याच्या जि. पं. माजी सदस्या सुमित्रा उगळे यांनी मांडले.
या कार्यक्रमांतर्गत समस्त मराठा समाज अभिवृद्धी संघाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला महिला व युवतीदेखील मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शशिकांत कडगावी, सुमन यादव व शशिकला मोरे यांनी केले. सुभाष कासारकर यांनी आभार मानले.
मराठा समाज संघटित हवा
कर्नाटकात 70 लाखांहून अधिक मराठा समाज आहे. पण हा असंघटित असल्याने तो विकासापासून वंचित आहे. येथील मराठा समाजाने मेळाव्याच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचे प्रभावी कार्य केले आहे. असे मेळावे गाव, तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर भरवून समाज एका झेंडय़ाखाली आणण्याचे सक्षम काम केले पाहिजे. असंघटित समाजाची मजबूत बांधणी होत नाही. आपली मोठी संख्या असल्यामुळे सरकार दरबारी आपला प्रतिनिधी कायमस्वरुपी राहू शकतो. त्यांच्या माध्यमातून आपण समाजाचा समग्र विकास साधू शकतो. छ. शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र करूनच स्वराज्याची बांधणी केली. तो इतिहास आपल्या डोळय़ासमोर आहे. तो भविष्यात सत्यात आणण्यासाठी एकदिलाने एकत्र या. तुमच्यावर कोणीच अन्याय करू पाहणार नाही. उलट तुमच्या पाठिशी भक्कम राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करेल, असा संदेश यावेळी मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य मंजुनाथ स्वामीजी यांनी दिला.