मंजुनाथ भारती स्वामीजींचे प्रतिपादन ः सकल मराठा समाजाच्यावतीने स्वामीजींचा सत्कार ः विविध मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालत मराठा समाजाने कार्य करणे अपेक्षित आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या गुरुंची शिकवण अथवा वचन पाळत या समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. समाजातील दुःख, पिडा दूर करून समाजाचा उद्धार करण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बेंगळूर येथील गोसावी मठाचे मठाधीश प. पू. मंजुनाथ भारती स्वामीजींनी केले.
सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी वडगाव येथील आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर नूल ता. गडहिंग्लज येथील भगवानगिरी महाराज, रुद्रकेसरी मठाचे हरिगुरु महाराज, सकल मराठाचे संयोजक किरण जाधव, आमदार अनिल बेनके, आमदार अंजली निंबाळकर, पायोनियर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, सकल मराठाचे संयोजक रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मराठा प्राधिकरणाचे अध्यक्ष मारुती मुळे, मराठा संघटनेचे शामसुंदर गायकवाड, निपाणीकर सरकार, दादाराजे निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वामीजी म्हणाले, भारत ही पुण्यभूमी असून या भूमिवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष जन्माला आले. संत तुकाराम महाराज, संतश्रे÷ ज्ञानेश्वर, नामदेव यासारख्या संतांनी ही भूमी पावन केली. समाजाचे दुःख दूर करण्यासाठी क्षत्रिय समाजाचा उदय झाला. भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम हेदेखील क्षत्रियच होते. क्षत्रिय समाजाने केलेल्या पराक्रमामुळे मराठय़ांचा जाज्वल्य इतिहास अधोरेखित करण्यासारखा आहे.
मराठा समाजाला नेतृत्वाची गरज
मराठा समाजाने एकत्रित येऊन शौर्य दाखविले तरच त्यांना आपले हक्क मिळतील. त्यामुळे मराठा समाजाला नेतृत्वाची गरज आहे. राज्यात 70 लाखांहून अधिक समाजबांधव असतानाही मंत्रिपद दिले जात नाही. ही आपली शोकांतिका आहे. नव्या पिढीमध्ये धर्मसंस्कार रुजवायचे असतील तर शालेय पाठय़पुस्तकांमध्ये भगवद्गीतेचा समावेश करावा, अशी मागणी स्वामींनी आपल्या भाषणातून केली.
मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांनी केवळ बेळगावच नव्हे तर आसपासच्या भागातील हजारो मराठाबांधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रत्येक समाजाला दिशा देण्यासाठी एका गुरुची गरज असते. तीच वाट आम्हाला मंजुनाथ भारती स्वामीजी दाखवत आहेत. असे सांगून मराठा समाजातील मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, शेतकऱयांना आधुनिक शेतीचे तंत्र अवगत व्हावे, महिलांसाठी उद्योग व युवकांसाठी क्रीडा प्रशिक्षण भविष्यात सुरू केले जाणार असल्याची माहिती दिली.
शिवरायांच्या इतिहासामुळे मराठय़ांचा दबदबा
मराठा म्हणजे मरेन पण वाकणार नाही, अशी इच्छाशक्ती बाळगणारा असा हा मराठा समाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासामुळे दक्षिण व उत्तर भारतात मराठय़ांचा दबदबा आहे. त्याकाळी महाराजांनी भाले-तलवारी घेऊन युद्ध लढले पण सध्याची लढाई ही आपल्याला पेन, पुस्तक व संगणकाच्या साहाय्याने लढायची आहे. याकडे आमदार अनिल बेनके यांनी लक्ष वेधले.
प्राधिकरणासाठीही द्यावा लागला लढा
खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, कर्नाटकात 70 लाखांहून अधिक संख्येने मराठा समाज आहे. हा मराठा समाज बेंगळूरपासून बेळगावपर्यंत तर कारवारपासून बिदरपर्यंत विखुरला गेला आहे. या समाजाला एकत्रित आणणे ही काळाची गरज आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी प्राधिकरणाची घोषणा केली. परंतु ते प्राधिकरण स्थापन करण्यासाठी लढा द्यावा लागला. प्राधिकरणासाठी राज्य सरकारने 15 लाखांचा निधी दिला असून तो कमी पडत आहे. त्यामुळे पुढील काळात हा निधी वाढविण्यासाठी विधानभवनात नक्की आवाज उठवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
सकल मराठाचे संयोजक रमाकांत कोंडुसकर म्हणाले, शेतकऱयांच्या जमिनीकडे वाकडय़ा नजरेने पाहणाऱयांची गय केली जाणार नाही. स्वतःला हिंदू न समजणाऱयांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये, शिवाजी महाराजांनी आमच्या नसानसात हिंदूत्व कोरले असल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध योजनांतून मराठा समाजाचा विकास
मराठा समाज प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. जी. मुळे यांनी प्राधिकरणाला मिळालेले पैसे हे विविध योजनातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. जिजाऊ जलभाग्य योजनेतून 2 कोटी रुपये, केळदी चन्नम्मा सुरभी योजनेतून राज्यातील मराठा समाजातील महिलांना 500 गायी व शहाजीराजे स्वयंम रोजगार योजनेतून युवकांना स्वयंम रोजगारासाठी प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती दिली.
प्रारंभी स्वामीजींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मोहन पाटील, सुनील जाधव, दत्ता जाधव व चंद्रकांत कोंडुसकर यांनी सपत्नीक स्वामीजींची पाद्यपूजा केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गुणवंत पाटील यांनी स्वागत केले. तर अनंत लाड यांनी परिचय करून दिला. महादेव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सागर पाटील यांनी आभार मानले.
बेळगावमध्ये स्थापन करावा मराठा समाजाचा मठ
बेळगाव परिसरात 60 टक्क्मयांहून अधिक मराठा समाज आहे. या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी गुरुची गरज आहे. आज कर्नाटकात प्रत्येक समाजाचे गावोगावी मठ असून त्या मठांमधून त्या समाजाची संस्कृती, परंपरा जपली जात आहे. याचप्रमाणे मराठा समाजाचाही बेळगावमध्ये एक मठ असावा. यातून बेळगाव परिसरात मराठा समाजाचा विस्तार करता येईल. या मठासाठी सर्व नेतेमंडळी व समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा, अशी इच्छा मंजुनाथ भारती स्वामीजींनी व्यक्त केली.