लाल निशाण पक्षाची भूमिका राज्य सरकार, संभाजीराजे यांच्या भूमिकांचे स्वागत
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य सरकारकडे संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी काही सवलती मागितल्या आहेत. राज्य सरकारने देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे. हे लक्षात घेऊन संभाजीराजे यांनी मूक आंदोलन स्थगित केले आहे. या भूमिकांचे लाल निशाण पक्ष स्वागत करीत आहे. या सवलतीतून काही प्रमाणात दिलासा मिळेल पण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणे आवश्यक आहे , अशी भूमिका लाल निशाण पक्षाने मांडली आहे.
पत्रकार परिषदेत सुधाकर सावंत, सुवर्णा तळेकर, प्रकाश जाधव, उमेश देसाई, अतुल दिघे, दिलीप लोखंडे, प्रकाश कांबरे यांनी लाल निशाण पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी दिलेली माहिती अशी : बहुतांश शेतीवर अवलंबून असणाऱया मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर टिकाऊ आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने यापूर्वी लाखोचे मोर्चे काढण्यात आले. राज्य सरकारने यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा समाजाला त्याचे स्वतंत्र आरक्षण असावे. एसईबीसी आरक्षण तोकडे आहे.
तसेच त्यांना ओबीसीच्या आधीच तोकड्या आरक्षणात घुसडणे अयोग्य आहे. ओबीसी व मराठा दोघांवर अन्याय करणारे आहे. सध्याही या समाजाच्या प्रगतीत फारसा फरक पडलेला नाही पण ज्यांना आरक्षणे मिळाली त्याना त्याचा फायदा काही प्रमाणात झाला आहे. परंतु हजारो वर्षाच्या अज्ञानाने जो मागासलेपणा आहे. त्या विरोधी संघर्षात आरक्षण हा प्रश्न महत्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50 टक्क्यांची मर्यादा केंद्र शासनाने रद्द करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मराठा आरक्षणावर पक्षीय राजकारण नको
मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. त्यावरून काही लोक पक्षीय राजकारण करून कुरघोड्या करू पहात आहेत. हे तातडीने थांबवावे व मराठा समाजाच्या हितासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन लाल निशाण पक्षाने केले आहे.